मालेगावी मांडवात दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:17 IST2021-01-11T18:43:42+5:302021-01-12T01:17:59+5:30
मालेगाव : वृक्ष तोड होत असल्याने मोठ्या प्रमाणात जंगलांचा ऱ्हास होत आहे. विवाह सोहळ्यांमध्ये मांडवांना विशेष महत्त्व आहे. कसमादे परिसरात मांडवाला नातलगांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. घरावर जांभूळ, आंब्याच्या पानांचे डगळे टाकतात. परंतु दिवसेंदिवस आंबा, जांभूळ वृक्षांची संख्या घटत असून, पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. या वृक्षांची घटती संख्या लक्षात घेऊन आंबे व जांभूळ यांची झाडे कमी झाल्याने मांडवाला डगळे देण्यास शेतमालक तयार नसतात. त्यावर पर्याय म्हणून शहरातील चर्चगेट भागातील डॉ. अरुण पठाडे यांनी अभिनव असा उपक्रम राबविला.

मालेगावी मांडवात दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
कनिष्ठ भगिनी कुणाक्षीच्या लग्न मांडवातील उपस्थितांना बेल वृक्षाच्या रोपांचे दान करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. सुमारे १११ जणांना डॉ. पठाडे यांनी बेलाची रोपे दिली. यावेळी मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नगरसेवक सुनील गायकवाड, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे, माजी जि. प. सदस्य भिकन शेळके, अशोक शिंदे, सुभाष पाटील, डॉ. राजेंद्र ठाकरे, वाय. के. खैरनार, रोटरीचे राजेंद्र भामरे, दिलीप ठाकरे, अमित खरे, विजेंद्र शर्मा, आदी उपस्थित होते.
आदर्श उपक्रम...
ग्रामीण भागासह शहरातही विवाह सोहळ्याच्या वेळी मांडवाला येणाऱ्या पाहुण्यांसह वऱ्हाडी मंडळींना टोपी, उपरणे, शाल, पागोटे देऊन सन्मानीत करण्यात येते. त्यात चुकून नजरचुकीने सन्मान करणे सुटल्यास लग्न घरातील मंडळींची धावपळ होते. त्यामुळे विवाह सोहळ्यात रुसवा फुगवा सुरू होतो. याला फाटा देण्यासाठी बेलाची रोपे देण्याचा आदर्श उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याचे परिसरात स्वागत होत आहे.