ज्ञानातून व्हावी समाजाची जडणघडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:15 IST2018-03-13T00:15:24+5:302018-03-13T00:15:24+5:30
आपण समाजासाठी आपल्या ज्ञानाचा कितपत उपयोग करतो, याचे आत्मपरीक्षण पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी करावे. आपला सर्वांगीण विकास शिक्षणाच्या माध्यमातून साधताना समाजाच्या जडणघडणीसाठी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.

ज्ञानातून व्हावी समाजाची जडणघडण
नाशिक : आपण समाजासाठी आपल्या ज्ञानाचा कितपत उपयोग करतो, याचे आत्मपरीक्षण पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी करावे. आपला सर्वांगीण विकास शिक्षणाच्या माध्यमातून साधताना समाजाच्या जडणघडणीसाठी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले. निमित्त होते, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या तृतीय पदवीप्रदान सोहळ्याचे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.१२) पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. तसेच नाना महाले, भाऊसाहेब खातळे, सचिन पिंगळे, हेमंत वाजे, प्रा. नानासाहेब दाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी चव्हाण म्हणाले, स्पर्धेच्या या युगात स्वत:ला टिकवून सिद्ध करण्यासाठी अभ्यासासोबत माहिती-तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. एकूण आपले व्यक्तिमत्त्व ‘स्मार्ट’ करण्यावर भर द्यावा. मंगेश पाडगावकर लिखित ‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान’ या विद्यापीठ गीताने पदवीप्रदान सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन तुषार पाटील व डॉ. सुरेश जाधव यांनी केले. सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी आभार मानले.
विद्यापीठामध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त मविप्र संस्थेच्या नऊ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना चव्हाण यांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पदवीग्रहण क रण्याप्रसंगी असलेला विशेष गणवेश परिधान केला होता. याबरोबरच व्यासपीठावर मान्यवरांनीही पदवीदान करतानाचा गणवेश परिधान केला होता.