अंत:करणापासून नामस्मरण करावे कनकेश्वरी देवी : श्रीराम कथा सत्संग सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:51 IST2018-03-04T00:51:51+5:302018-03-04T00:51:51+5:30

अंत:करणापासून नामस्मरण करावे कनकेश्वरी देवी : श्रीराम कथा सत्संग सोहळा
पंचवटी : साधकाचे जीवन साधे, सोपे, सरळ व कमीत कमी गरजा असणारे असायला हवे. ईश्वर मातेसमान असून, तो सर्वांवर सारखीच माया करतो. परमात्मा सर्वत्र आहे. ईश्वराची रूपे वेगवेगळी असली तरी चैतन्यशक्ती एकच आहे. साधकाने देवाचे नामस्मरण अंत:करणापासून करावे, असे प्रतिपादन मॉ कनकेश्वरी देवी यांनी केले. हिरावाडीरोडवरील सद्गुरू सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री रामनाम महिमा आधारित श्रीराम कथा सत्संग सोहळ्याप्रसंगी प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी पुढे असे सांगितले की, साधकाने परमेश्वराच्या कोणत्याही एका रूपाचा आधार घेऊन निरंतर भक्ती करावी. श्रीराम जयराम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र तारक आहे. भजनाने एकाग्रता वाढते तसेच तृप्ती मिळते म्हणून देवाचे नामस्मरण प्रत्येकाने करावे. परमात्मा नामरूपात, गुरुरूपात साधकाला भेटत असतो. भगवंताची विविध रूपे ही सद्गुणांची प्रतीके मानली जातात. मानवी रूपातही ईश्वर भेटू शकतो. परमात्मा अदृश्य, निराकार आहे. साधकाने भक्ती करताना आळस किंवा चालढकल करू नये. भजनांनी मन प्रसन्न होते. कीर्तनाने ज्ञान वाढते. मन आणि बुद्धीचा समन्वय नाम साधनेने साधता येतो हे विविध दाखले देऊन स्पष्ट केले. श्रीरामाला, राम भजनाला विसरणे म्हणजे स्वत:ला विसरणे होय. विस्मरण होऊ नये म्हणून भगवंताची अखंड नामसाधना करावी, असेही कनकेश्वरी शेवटी म्हणाल्या. श्रीराम कथेला पंचवटीसह शहरातील विविध भागामधील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.