सिन्नरला श्रमदानातून कमळेश्वर बारवेला गतवैभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 18:41 IST2019-06-10T18:40:31+5:302019-06-10T18:41:49+5:30
सिन्नर : धारणकर गल्लीतील ऐतिहासिक कमळेश्वर बारवेतील गाळ बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, बारवेच्या जीवंत पाण्याचे जवळपास सर्वच स्त्रोत पुन्हा जीवंत झाले आहेत.

सिन्नरला श्रमदानातून कमळेश्वर बारवेला गतवैभव
मुख्य कुंडापर्यंत चारही बाजूने पोहचता येईल अशा दगडी पायऱ्या गाळात दाबल्या गेल्या होत्या. जवळपास महिनाभराच्या श्रमदानातून कुंडाभोवतीच्या दहा पाय-या मोकळ्या करण्यात सर्वच यशस्वी झाले आहेत. मुख्य कुंडातील गाळ काढण्यास प्रारंभ होताच, अवघ्या फुटभर अंतरावरच जीवंत पाण्याचे स्त्रोत पुहा पाझरू लागले आहेत. कुंडातील पाणी बाहेर काढण्यासाठी १ अश्वशक्तीची जलपरी टाकण्यात आली. सुमारे तीन तास या जलपरीने पाण्याचा उपसा केल्यानंतरही कुंडात काम करणे अवघड बनले आहे. शेवटी नगरपरिषदेच्या व्हॅक्यूम खेचणारा ट्रॅक्टर बोलावण्यात आला. त्याने ब-यापैकी पाणी कमी केल्यानंतर आता दिवसभर श्रमदानाने गाळ काढण्याचे काम सुरू आहे. कुंडातील मुख्य गोमुखाचे अजून दर्शन झाले नसून ते मोकळे झाल्यास पाण्याचा स्त्रोत थाबवणे अवघड बनू शकते. त्यामुळे कुंडाच्या परिसरातील सर्व पाय-या धुवून स्वच्छ करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. इच्छापूर्ती गणेश मंडळ, शिवराय मित्रमंडळ, ‘तुफान आलंया’चे मित्र, ग्रीन रेव्होल्युशनचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवत आहेत. या सफाई मोहिमेत मोठ्या प्रमाणावर अवजड असे दगडी चिरे बाहेर काढण्यात येत असून पंकज देशमुख, दीपक मोरे, विठ्ठल गोबाडे, संतोष डंबरे, लकी तुपे, चंदन देशमुख, राजेंद्र क्षत्रीय, दत्ता बोºहाडे यासाठी परिश्रम घेत आहेत.