नाशिक विभागात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 07:21 PM2017-12-14T19:21:43+5:302017-12-14T19:24:09+5:30
कृषी खात्याने या संदर्भात आपला अहवाल शासनाला सादर केला असून, त्यात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कापसाबरोबरच काढणीवर आलेल्या तुर, व हरभरा पिकावरही खराब हवामान तसेच अवकाळी पावसाने हल्ला चढविल्याने काही प्रमाणात या पिकांना धोका निर्माण झाला आहे.
![Influence of bollworm on cotton in Nashik division | नाशिक विभागात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव Influence of bollworm on cotton in Nashik division | नाशिक विभागात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/cotton_2017082910.jpg)
नाशिक विभागात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव
नाशिक : खराब हवामान व निकृष्ट औषध फवारणीमुळे नाशिक विभागात सरासरी ६० टक्क्याहून अधिक कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून, शेतक-याच्या हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. विभागात सर्वाधिक कापुस पिकाला फटका धुळे व जळगाव जिल्ह्याला बसला असून, नाशिक जिल्ह्यातील ३९ टक्के कापुस पिकही बोंडअळीने बाधित झाले आहे.
कृषी खात्याने या संदर्भात आपला अहवाल शासनाला सादर केला असून, त्यात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कापसाबरोबरच काढणीवर आलेल्या तुर, व हरभरा पिकावरही खराब हवामान तसेच अवकाळी पावसाने हल्ला चढविल्याने काही प्रमाणात या पिकांना धोका निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यात कापुस लागवडीखाली ०.४६ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातील १८ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापुस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच हरभरा पिकावर इगतपुरी तालुक्यात मर रोगाचा तर तूर पिकावर गावात शेंगमाशी व शेंगांचे नुकसान या किडी प्रादुर्भाव आढळून आला आहे. धुळे जिल्ह्यात २.०५ लाख हेक्टर क्षेत्र कापुस लागवडीखाली असून, तेथे संपुर्ण क्षेत्रावरील पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच तूर पिकावर एकूण सहा गावांमध्ये शेंगमाशी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात १.०२ लाख हेक्टर क्षेत्र कापुस लागवडीखाली असून, त्यातील ०.३६ लाख हेक्टर क्षेत्र म्हणजेच ३५ टक्के कापुस पिकाला कीडीने नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात ४.७६ लाख हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे,त्यातील ३.८६ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. विशेष म्हणजे कापूस काढणीच्या तयारीत असतानाच त्यावर कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्य सरकारने यापुर्वीच कृषी खात्याला पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.