इगतपुरी तहसीलवर महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:46 IST2019-02-07T00:43:20+5:302019-02-07T00:46:15+5:30
इगतपुरी : तालुक्यातील शेणवड खुर्द गावात तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत असून या गावातील महिलांनी एकत्र येत माजी सरपंच मीरा ...

शेणवड खुर्द येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी शेणवड खुर्द येथील महिलांनी तहसील कार्यालयावर काढलेला हंडा मोर्चा.
इगतपुरी : तालुक्यातील शेणवड खुर्द गावात तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत असून या गावातील महिलांनी एकत्र येत माजी सरपंच मीरा हेमंत झोले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. कृत्रिम पाणी टंचाईला जबाबदार असणाऱ्यांविरोधात निवासी नायब तहसीलदार चरण दोंदे यांना निवेदन दिले. यावेळी महिलांनी संताप व्यक्त करीत घोषणाबाजी केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गावात तीव्र पाणीटंचाई भासत असून महिला वर्गाला पहाटेपासुनच पाणी भरण्यासाठी हातपंपावर जावे लागते. पूर्ण दिवस हंडाहंडा पाणी भरण्यातच जात आहे. त्यामुळे उपजीविकेसाठी कामधंद्याला जाता येत नाही. गावची पाणीपुरवठा, नळ योजना सुरळीत करण्यास गावचे सरपंच व ग्रामसेवक कामचुकारपणा करत असून, गावातील स्टँड पोस्टदेखील गायब करून त्याच्यात अफरातफर केल्याची दाट शक्यता आहे. यावेळी माजी सरपंच मीरा झोले, सविता भारमल, मीरा कुंदे, पुष्पा गवारी, अलका पावडे, ज्योती झोले, अर्चना आंबवणे, भिकूबाई दराणे, जिजाबाई खेताडे, झुंबराबाई आंबवणे, शोभा गवारी, पार्वता वारघडे, पूजा झोले, सुनीता दराणे, मीना खेताडे, नंदा हेमंत झोले, हरीष कुंदे, अरुण वारघडे, संतोष मराडे, पोपट भारमल, किरण वारघडे, किसन दराणे, शिवा बांगर, प्रकाश गवारी, रोहिदास बांगर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.सखोल चौकशीची मागणी
पाणी न देता ग्रामपंचायत नागरिकांकडून दमदाटीने पाणीपट्टी वसूल करीत असून, नियोजनाअभावी जनतेला वेठीस धरले जात आहे. सदर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करून गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, तसेच ग्रामपंचायतीची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.