अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, नुकसानभरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:54 IST2019-11-13T17:54:17+5:302019-11-13T17:54:34+5:30
श्रमजीवींचे निवेदन : ग्रामीण भागात मोठे नुकसान

अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, नुकसानभरपाईची मागणी
शेणीत : इगतपुरी तालुक्यातील असंख्य गावांमध्ये गेल्या चार महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी यासाठी श्रमजीवी संघटनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना भाकड यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात गेल्या चार महिन्यांत अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतपिकांबरोबरच ग्रामीण भागातील घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. अनेक कुटुंबांना पावसाच्या पाण्यातच घरात राहावे लागले तर काही लोक बेघर झाले. या घरांच्या पडझडीबाबत नुकसानग्रस्त रहिवाशांनी स्थानिक तलाठीमार्फत पंचनामा करून प्रकरण तहसीलदार यांच्याकडील कार्यालयात जमा केले आहे. त्यात घोटी बुद्रुक २, शिरसाठे गाव ७, मोडाळे गाव १२, पांगुळगाव १, परदेश वाडी ३, खेड १, कुरनगवाडी १, गोंदे दुमाला ३, मुरंबी २०, कुशेगाव २, आधारवड ४, धारगाव ३, धामणगाव १२,नांदगाव सदो ३, बोरली २, पाडळी १०, मालुंजे ९, मोगरे ४, मांजरगाव १०, वालवीर ४२, कांचनगाव १५, काळुस्ते ४८ यासह अडसरे, शिरसाठे, मोडले, खेड, बेलगाव कुºहे, शेणीत, खडकेद, टाकेद अन्य गावांतील २९६ नुकसान बाधित लोकांचे अर्ज तहसील कार्यालयात दाखल आहेत. मात्र, त्यावर अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. लोकांना नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याने अजूनही काही लोक पडक्याच घरात राहत आहेत. नुकसानग्रस्त लोकांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, संजय ठोंबरे, शांताराम भगत यांनी केली आहे.