नरेश हाळणोर
नाशिक दळणवळणाच्या सोयीसुविधा अन् शहरांच्या विकासासाठी नेहमीच वृक्षांच्या बुंध्यांवर कुºहाडीचे घाव घातले जात असताना, नाशिक जिल्ह्यात कोटींच्या वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करीत असताना, गेल्या वर्षीच्या लागवडीपैकी ८० टक्के रोपे जगली आहेत. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने दिलासादायक असून, यंदाही ४० हेक्टर जागेवर सुमारे सव्वा लाखापेक्षा अधिक रोपांची लागवड केली जाणार आहे. राज्य शासनाने शंभर कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गेल्या दोन वर्षांपासून निश्चित केले आहे. ज्यावर्षी हे लक्ष्य निश्चित केले नेमक्या त्याच २०१२ यावर्षी पावसाने दगा दिला आणि तयार केलेली रोपेच वाचविण्यासाठी शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाला झटावे लागले. गेल्या वर्षी मात्र पर्जन्यमान चांगले राहिल्याने जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करता आले. असे असले तरी एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांच्या निगराणीची समस्या शासनासमोर होती. त्यासाठी अभिनव उपक्रम राबवित रोपे जगविण्याची जबाबदारीच संबंधित यंत्रणा, ग्रामपंचायती, वनविभाग, वनीकरण, पालिकांच्या उद्यान कर्मचार्यांवर सोपविण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षी लागवड करण्यात आलेल्या रोपांपैकी ८० टक्के रोपे तगली असल्याचे सामाजिक वनीकरणाच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यंदाही उत्तम पाऊसपाणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून सुमारे एक लाख ३० हजार रोपांची लागवड ४० हेक्टर जमिनीवर केली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरणाकडे सद्यस्थितीत १४ लाख ३० हजार रोपे असून, यातील सव्वा लाख रोपांची ४० हेक्टर जमिनीवर लागवड केली जाणार आहे, तर उर्वरित १३ लाख रोपांची लागवड शासकीय कार्यालये, महामंडळ, औद्योगिक वसाहतींमध्ये केली जाणार आहे.