गंगापूर धरणातून विसर्ग घटला; गोदावरीची पातळी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 20:36 IST2018-08-19T20:32:51+5:302018-08-19T20:36:40+5:30
गंगापूर धरणातून सध्या दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. दारणा धरणातून चार हजार १७२ क्यूसेक, तर नांदूरमधमेश्वर बंधा-यातून ११ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे

गंगापूर धरणातून विसर्ग घटला; गोदावरीची पातळी घटली
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले होते. यामुळे धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. धरणसाठा जवळपास ९१ टक्क्यांवर पोहचला होता. त्यामुळे गंगापूर धरणातून दोन हजारांपर्यंतचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. रविवारी (दि.१९) दुपारनंतर विसर्ग कमी करण्यात आला असून, १५१८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.
शहरात पावासाने दोन दिवसांपासून विश्रांती जरी घेतली असली तरी गोदावरीच्या पातळीत वाढ झाली होती. यामुळे गोदावरीला पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. रामकुंड, देवमामलेदार पटांगणासह लहान पूल पाण्याखाली गेले होते. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही कमी करण्यात आला आहे. यामुळे गोदावरीची पाण्याची पातळीही कमी झाली आहे.
गंगापूर धरणातून सध्या दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. दारणा धरणातून चार हजार १७२ क्यूसेक, तर नांदूरमधमेश्वर बंधाºयातून ११ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. रविवारी दिवसभर शहरात पावसाने विश्रांती घेतली होती.
---