अखेर गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 00:15 IST2021-02-04T23:23:52+5:302021-02-05T00:15:45+5:30

नाशिक- २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर पुन्हा पुराचा धोका उद‌्भवू नये, यासाठी अखेरीस स्मार्ट सिटी अंतर्गत गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ झाला आहे. होळकर पूल ते फॉरेस्ट नर्सरीपर्यंत गाळ काढण्यात येत असून त्यामुळे पात्र खोल होईल आणि पाणी प्रवाही होण्यास मदत होणार आहे.

Finally start removing the sludge from the pot | अखेर गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ

अखेर गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ

ठळक मुद्देस्मार्ट सिटी : परिसरातील पुराचा धोका कमी होणार

नाशिक- २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर पुन्हा पुराचा धोका उद‌्भवू नये, यासाठी अखेरीस स्मार्ट सिटी अंतर्गत गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ झाला आहे. होळकर पूल ते फॉरेस्ट नर्सरीपर्यंत गाळ काढण्यात येत असून त्यामुळे पात्र खोल होईल आणि पाणी प्रवाही होण्यास मदत होणार आहे.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या कामाला गुरुवारपासून प्रत्यक्ष प्रारंभ झाला. ३.२ किलोमीटर अंतरातील नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी या टप्प्यातील पाणी रोखण्यात आले. प्रोजेक्ट गोदा अंतर्गत सध्या विविध कामे सुरू असून त्यात गोदावरी नदीकाठाचे सुशोभिकरण, पायाभूत सुविधा आणि ट्रॅश स्कीमरच्या मदतीने नदीची स्वच्छता करताना होळकर पुलाखाली स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तळ काँक्रिटीकरण हटवण्याबरोबरच गोदापात्रातील गाळदेखील काढण्यात येणार आहे. नऊ कोटी रुपये खर्चाचे हे काम आहे.
महापालिकेने यापूर्वी गोदावरी नदीवर पूल बांधताना आणि जलवाहिनी नेताना नदीपात्रात कॉफर डॅम (मातीचा बंधारा) बांधला होता. त्यामुळे नदीपात्रात गाळ साचला आहे. गाळ साचल्याने नदीपात्र उथळ झाले आहेत. २००८ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी या परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्यामागे अनेक कारणांपैकी या परिसरातील गाळ हे देखील कारण होते. परंतु पुरामुळे या परिसरात जलसंपदा विभागाने आखलेली पूररेषा ही आणखीनच अडचणीची ठरली होती. या पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या अंगिकृत संस्थेने ज्या उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यात नदीपात्रातील गाळ काढण्याचीदेखील शिफारस केली होती. आता हे काम सुरू झाल्यानंतर अनेक प्रकारचे लाभ होणार असले तरी पूररेषा कमी होण्यास मदत होणार आहे.

नदीपात्रातील गाळ काढल्यामुळे नदीपात्र विस्तृत होईल, खोली वाढेल तसेच वहन क्षमतादेखील वाढणार आहे. त्यामुळे परिसरात पुराचा धोका कमी होईल. विशेषत: होळकर पुलाखाली स्मार्ट सिटी अंतर्गत मॅकेनिकल गेट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे गाळ काढलेले पाणी नेमके टप्प्यात येऊन पुराचा धोका कमी होईल, असे स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी कंपनीने नदीपात्रातील गाळ काढल्यानंतर तो ठेवण्यासाठी एक जागा निश्चित केली असून आणखी दोन जागादेखील निवडल्या जाणार आहेत. मात्र, शेतीसाठी गाळ उपयुक्त असल्याने तो नेण्याचे आवाहन स्मार्ट सिटी कंपनीने केले आहे.

Web Title: Finally start removing the sludge from the pot