रोहित्र दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना बिलाची सक्ती नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:33 IST2018-09-27T15:30:08+5:302018-09-27T15:33:30+5:30
कृषिपंप वाहिनीवरील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून देताना संबंधित रोहित्रावरील सर्व कृषी ग्राहकांनी किमान रक्कम भरणे आवश्यक करण्यात आले आहे

रोहित्र दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना बिलाची सक्ती नको
नाशिक : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी कृषिपंपाचे थकीत विजबिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
या संदर्भात छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कृषिपंप वाहिनीवरील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून देताना संबंधित रोहित्रावरील सर्व कृषी ग्राहकांनी किमान रक्कम भरणे आवश्यक करण्यात आले आहे. २५ हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास ३ हजार तर त्यापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या कृषी ग्राहकांनी ५ हजार रुपये भरल्याशिवाय रोहित्र बसविले जात नसल्याने दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून, दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र रोहित्र नादुरुस्त झाल्यास थकबाकी भरून घेण्याचे महावितरणकडून आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शेतक-यांचे रोहित्र फेल झाल्यानंतर थकबाकी असलेल्या शेतक-यांना पैसे भरण्याची सक्ती केली जात आहे. थकबाकी भरली तरच नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून बसून दिले जात आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतक-यांना थकबाकी भरणे शक्य नाही. त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी शेतक-यांना कृषिपंपाची थकीत वीजबिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.