वीजेचा तुटवडा झाल्याने नाशिककरांवर भारनियमनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:14 IST2018-10-09T18:13:53+5:302018-10-09T18:14:56+5:30
नाशिक शहराचा देखील समावेश असला तरी मुख्य शहराला याची कोणतीही झळ बसणार नसून जी-१,जी-२,आणि जी-३ या ग्रुपमध्ये असलेल्या ग्राहकांनाच भारनियमानाचा सामना करावा लागण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली.

वीजेचा तुटवडा झाल्याने नाशिककरांवर भारनियमनाचे संकट
नाशिक: वीजेची वाढलेली मागणी आणि कोळशाअभावी औष्णिक वीज केंद्रांमधून वीजनिर्मिती घटल्यामुळे राज्याला सुमारे ५०० पेक्षा अधिक मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील काही शहरांमध्ये तातडीचे भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली आहे. यामध्ये नाशिक शहराचा देखील समावेश असला तरी मुख्य शहराला याची कोणतीही झळ बसणार नसून जी-१,जी-२,आणि जी-३ या ग्रुपमध्ये असलेल्या ग्राहकांनाच भारनियमानाचा सामना करावा लागण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली.
राज्यात गेल्या आठवड्यापासून वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे महावितरणने खाजगी उत्पादकांकडून वीज खरेदी करून वीजेची गरज भागविली आहे. असे असले तरी राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमधील वीजनिर्मिती कोळशाअभावी घटल्यामुळे राज्यात ५०० ते १५०० मेगावॅट पर्यंत वीजेचा तुटवडा निर्माण झालेला आहे. यामुळे महावितरणवर राज्यात भारनियमन करण्याची वेळ आलेली आहे. यामध्ये औरंगाबाद, बीड, नाशिक, आणि मुंब्रा या शहरांचा समावेश करण्यात आला असल्याचे समजते. या शहरातील ग्रामीण भागालाच मात्र भारनियमनाचा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भातील वेळापत्रक अद्याही जाहिर करण्यात आले नसल्यामुळे भारनियमन किती तास असू शकेल या विषयी देखील संभ्रम आहे.
-इन्फो--
वीजेचा लपंडाव सुरूच
भारनिमयमनाची झळ शहरवासियांना बसणार नसल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला तरी गेल्या आठवडाभरापासून शहरात अवेळी वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले अ ाहे. तांत्रिक दोष असल्याचे कारण यामागे असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात दिवसातूून अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतोच कसा याबाबत मात्र अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. तांत्रिक दोष असेल तर तो दुरूस्त झाल्यानंतरही वारंवार वीज गायब होतीच याचे उत्तरही अधिकारी दयायला तयार नाहीत.