‘आधार’ नसल्याने ‘निराधार’ होण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 16:53 IST2019-06-03T16:53:19+5:302019-06-03T16:53:45+5:30
बोटांचे ठसे पुसट : इगतपुरीच्या शेतकऱ्याची कार्डसाठी दमछाक

‘आधार’ नसल्याने ‘निराधार’ होण्याची वेळ
भास्कर सोनवणे, इगतपुरी : विविध शासकीय योजनांपासून गॅस, बँक, खतांची खरेदी, पॅन कार्ड आदींसाठी आधार कार्ड हा परवलीचा शब्द बनला आहे. असे असले तरी इगतपुरी तालुक्यातील निनावी ह्या गावातील शेतकरी शंकर गायकवाड यांना मात्र हाताच्या बोटांचे ठसे पुसट झाल्याने शेकडो प्रयत्न करूनही आधार कार्ड मिळत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
गायकवाड यांनी सन २०१३ पासून शेकडो आधार केंद्र ते मुंबईचे कार्यालय गाठूनही त्यांना आधार कार्ड मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे गॅस कनेक्शन तर केव्हाच बंद झालेले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडावी म्हणून त्यांनी अनेक खेटा घातल्या. मात्र जिल्हाधिका-यांना भेटू दिले जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. आधार नसल्यामुळे ह्या शेतक-यावर निराधार व्हायची मात्र वेळ आली आहे. शंकर गायकवाड हे कष्टकरी शेतकरी आहेत. कष्टामुळे त्यांच्या हाताचे ठसे पूर्णपणे पुसून गेले आहेत. २०१३ पासून त्यांनी जिल्ह्यातील विविध आधार कार्ड सेंटरला खेटा घातल्या. ६ वर्षांपासून ते आधार कार्ड मिळावे म्हणून अविरत प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडे निव्वळ आधारच्या पावत्या असून आधारच्या मुख्य कार्यालयाकडून त्यांचे आधार प्रत्येकवेळी नाकारले जात आहे. आधार नसल्यामुळे त्यांचे गॅस कनेक्शन आणि मिळणारे अनुदान बंद करण्यात आले आहे.
मुलगा सैन्यदलात
शेतकरी शंकर गायकवाड यांचा एक मुलगा सैन्यात सेवेत आहे. देशाची सेवा करणारे कुटुंब असूनही आधारमुळे त्यांची ससेहोलपट होतांना दिसून येत आहे. सैन्यातील वरिष्ठ अधिकाºयांकडे मुलाने याबाबत माहिती द्यावी असे शंकर गायकवाड यांनी मुलाला कळवले. मात्र सैन्याशी संबंधित नसलेला विषय कसा मांडावा असा प्रश्न मुलाला पडला आहे.