थंडीमुळे जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: January 9, 2017 00:36 IST2017-01-09T00:36:19+5:302017-01-09T00:36:31+5:30
सिन्नर, मेशी : वातावरणात कमालीचा गारवा

थंडीमुळे जनजीवन विस्कळीत
सिन्नर : गेल्या आठवड्यात कमी झालेल्या थंडीने सध्या चांगलाच जोर धरला आहे. वाढलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काहीशा गायब झालेल्या थंडीचे या आठवड्यात जोरदार आगमन झाले आहे. सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. बोचऱ्या थंडीबरोबरच वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे चांगलीच हुडहुडी भरत आहे. थंडीच्या कडाक्यामुळे सर्वच दैनंदिन कामे सध्या उशिराने सुरू होताना दिसत आहे.
मेशी : परिसरात यावर्षी पाऊस चांगला झाल्याने तीन वर्षांपासून दुष्काळग्रस्त देवळा पूर्व भागात यंदा रब्बी हंगामात पिके जोमात असून, थंडीने उच्चांक गाठला आहे. परिसरात थंडीमुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. रब्बी पिकांना ही थंडी पोषक असल्याचे बोलले जात आहे. सध्या शेकोट्यांनी जोर धरलाआहे. शेकोट्या करून त्या भोवती बसून विविध गप्पा मारताना अनेक ग्रामस्थ दिसत आहते. यात नोटाबंदीमुळे झालेले परिणाम व फायदे याविषयी चर्चा रंगताना दिसत आहे. तसेच शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. राज्यातील काही भागात होत असलेल्या नगरपालिका निवडणूक व आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांविषयी चर्चा रंगत आहेत. अजून काही दिवस थंडीचा जोर कायम असेल, असे जाणकारांचे मत आहे. (वार्ताहर)