महामार्ग बसस्थानकाला वाहनांचा विळखा
By Admin | Updated: December 5, 2015 22:44 IST2015-12-05T22:43:45+5:302015-12-05T22:44:22+5:30
महामार्ग बसस्थानकाला वाहनांचा विळखा

महामार्ग बसस्थानकाला वाहनांचा विळखा
इंदिरानगर : मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकालगतचा रस्ता अद्यापही प्रवासी वाहनांमुळे आणि अनधिकृत टपऱ्यांच्या विळखातून मुक्त झालेला नाही. त्यामुळे महामार्ग बसस्थानक केव्हा मोकळा श्वास घेणार? असा प्रश्न आहे.
मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगरसह परिसरातील हजारोच्या संख्येने राहणाऱ्या नागरिकांना शहरात ये-जा करणाऱ्या महामार्ग बसस्थानकालगतच्या रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे आणि महामार्ग बसस्थानकातून कसारा, नगर, शेगाव, शिर्डी, संगमनेर, नेवासा यांसह विविध शहरांना आणि गावांना दररोज बसेस फेऱ्या मारता. त्यामुळे दिवसभर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणास अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटविल्या होत्या आणि रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे वाहतुकीस रस्ता मोकळा होईल, असे वाटले होते. परंतु तसे काही झाले नाही. रस्त्याचे डांबरीकरण आणि त्यावर ट्रॅव्हल्सच्या बसेस तीन ते चार तास रस्त्यावर उभ्या असतात. तर त्यात आता चारचाकी लहान-मोठी प्रवासी वाहनेही उभी राहात असल्याने दिवसभर वाहतूक कोंडी जणू काही सूत्रच बनले आहे. तसेच काही विक्रेतेही पुन्हा रस्त्यावरच ठाण मांडून बसून असतात. त्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे. (वार्ताहर)