येवल्यात पाणीच पाणी झाल्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 22:27 IST2021-09-28T22:26:24+5:302021-09-28T22:27:26+5:30

येवला : शहरासह तालुका परिसरात सुरू असणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Crops damaged due to waterlogging in Yeola | येवल्यात पाणीच पाणी झाल्याने पिकांचे नुकसान

नवीन व्यापारी संकुलाजवळ गणेश चाळ भागात साचलेले पाणी.

ठळक मुद्देशहरात पावसाने अनेक ठिकाणी गुडघ्यापर्यंत साचले पाणी

येवला : शहरासह तालुका परिसरात सुरू असणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडतो आहे. शहरात पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले. मुख्य महामार्गालगत असणारा नाला तुंबल्याने बजरंग मार्केट, शनी पटांगण, नवीन व्यापारी संकुल भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते.

अनेक व्यावसायिकांचे या पाण्यामुळे नुकसान झाले आहे, तसेच शहरातील लक्कडकोट, हुडको भागातही पाणी साचल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली.
ब्रिटिशकालीन असलेला तालुक्यातील सर्वांत मोठा खिर्डीसाठे येथील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला असून, संध्याकाळी गेल्या अनेक वर्षांनंतर सांडव्यावरून पाणी वाहताना दिसून आले.

नगरसूल परिसरात सुरू असलेल्या पावसाने परिसरातील ओढे, बंधारे भरले असून, गावातील मुख्य वसंत बंधाराही ओव्हरफ्लो झाल्याने नारंदी नदीला पूर आला आहे. आजच्या, पावसाने तालुक्यातील सर्वच बंधारे भरून गेले आहेत. नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहे.
मका, सोयाबीन, पोळ कांदे, कांदा रोपे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Crops damaged due to waterlogging in Yeola