मास्क न वापरणाऱ्यांवर फौजदारी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 17:38 IST2021-04-13T17:36:54+5:302021-04-13T17:38:00+5:30
कळवण : शहरातील कोरोना बाधितांचा आकडा २०० च्या पुढे गेल्यामुळे कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी महासंघाने कळवण शहरात ...

कळवणच्या मेनरोडवर विनाकारण फिरणाऱ्याची चौकशी करतांना पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल, जनसंपर्क अधिकारी योगेश पगार आदी.
कळवण : शहरातील कोरोना बाधितांचा आकडा २०० च्या पुढे गेल्यामुळे कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी महासंघाने कळवण शहरात १८ एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू पुकारला असतांना गल्लीबोळात टगेगिरी करणाऱ्यांविरोधात पोलिस व नगरपंचायतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गल्लीबोळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यां दोघांची थेट कोरोना चाचणी करुन त्यांना कोरोना सेंटरमध्ये दाखल केले तर चौघांवर फौजदारी दाखल करण्यात आली. २० व्यक्तीकडून ५००० रुपये दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली.
१८ एप्रिल पर्यंत सर्वानुमते पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्युला शहरातील व्यावसायिकांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळत असतांना विनाकारण गल्लीबोळात फिरणाऱ्यांचा बंदोबस्त होत नसल्याची तक्रार कळवण व्यापारी महासंघाने करुन मनमाड पोलिसांच्या धर्तीवर कळवण पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड कोविड टेस्ट करावी अशी मागणी केली होती.
पोलिस प्रशासनाने दीपक महाजन यांच्या तक्रारीची दखल घेत मंगळवारी (दि.१३) मेनरोड परिसरात कडक बंदोबस्त ठेवत रस्त्यावर फिरणाऱ्या चौघांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. वीस व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करुन ५ हजार रुपये दंड वसुल केला, तर दोघांची रॅपिड कोविड टेस्ट केली.