खबरदारी : शहरात पोलिसांचा जमावबंदी आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 16:34 IST2021-02-10T16:28:44+5:302021-02-10T16:34:57+5:30
जोरजोराने सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे घोषणाबाजी करणे, राज्याची सुरक्षा धोक्यात येईल, यासारखे चिथावणीखोर भाषणे करणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, निर्देशित वेळेव्यतिरिक्त अन्य वेळेत फटाके वाजविणे आदी प्रकारच्या कृत्यांवर बंदी

खबरदारी : शहरात पोलिसांचा जमावबंदी आदेश जारी
नाशिक : शहर व परिसरात बुधवारी (दि.१०) रात्रीपासून तर येत्या बुधवारपर्यंत (दि.२४) पंधरवड्यासाठी जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी जारी केली आहे.
आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, क्रांतीवीर लहुजी साळवे पुण्यतिथी, कॉम्रेड गोविंद पानसरे पुण्यतिथींसारखे सार्वजनिक सण, उत्सव या काळात साजरे होत आहे. तसेच दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर नाशकातील शेतकरी व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांकडून (सीआयटीयु संघटना) निदर्शने, आंदोलने होण्याची दाट शक्यता लक्षात घेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे अधिसुचनेत म्हटले आहे.
दरम्यान, यानिमित्ताने शहरात दाहक व स्फोटक पदार्थ, लाठ्या, काठ्या, गावठी कट्टे, चाकू, चॉपर, तलवारी सोबत बाळगण्यावर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे किंवा प्रेताचे दहन करत प्रदर्शन करण्यासही मनाई करण्यात आली आहे. जोरजोराने सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे घोषणाबाजी करणे, राज्याची सुरक्षा धोक्यात येईल, यासारखे चिथावणीखोर भाषणे करणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, निर्देशित वेळेव्यतिरिक्त अन्य वेळेत फटाके वाजविणे आदी प्रकारच्या कृत्यांवर बंदी घालण्यात आल्याचे अधिसुचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. या अधिसुचनेचे उल्लंघन करताना आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव
महाराष्ट्र पोलीस कायदा कलमान्वये पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असून पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहे. जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, अंत्ययात्रा, सिनेमागृह यांना लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.