लोकप्रतिनिधींना गावबंदीसह आगामी निवडणुकांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 17:59 IST2018-09-09T17:58:45+5:302018-09-09T17:59:07+5:30
चणकापुर झाडी एरंडगांव उजवा कालव्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीच्या अजेंड्यावर असतो. या प्रलंबित प्रश्नाची सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे यापुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा तसेच गावबंदीचा निर्णय देवळा तालुक्यातील तिसगांव येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

लोकप्रतिनिधींना गावबंदीसह आगामी निवडणुकांवर बहिष्कार
हनुमान मंदिरात झाडी एरंडगांव कालवा संदर्भात ग्रामपंचायत, सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामस्थांची बैठक झाली. पंचेचाळीस वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला चणकापूर झाडी एरंडगाव कालवा काम कधी पूर्ण होईल व चणकापूर धरणाचे पाणी झाडी एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता कायम करत असते. हा कालवा या भागातील जनतेसाठी एक दिवास्वप्न बनला आहे. चणकापूर ते झाडी एरंडगाव उजवा कालवा गेल्या अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने निवडणुकींच्या माध्यमातून पुढे सरकत आला आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंबहुना साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही कालवा पूर्णत्वाचे स्वप्न राजकीय मंडळींनी दाखविले आहे. जो उमेदवार जास्त प्रभावीपणे कालवा पूर्णत्वाचा प्रश्न जनतेसमोर मांडेल त्याला आजपर्यंतच्या निवडणुकीत जनेतेने निवडून दिले आहे, तरी प्रश्न मार्गी लागलेला नाही.