भावली ग्रामस्थांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 15:46 IST2018-08-28T15:46:40+5:302018-08-28T15:46:56+5:30

भावली ग्रामस्थांचा ठिय्या
घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या भावली गावाचे पुनर्वसन न करता यावर्षी धरणाचे गेट बंद केल्याने या गावात यावर्षी पाणी येणार असल्याने भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून घोटी येथे महामार्गावर सिन्नर फाटा येथे ठिय्या आंदोलन केले. मात्र सदर गावात पाणी जाऊ देणार नाही आणि ग्रामस्थांना विस्थापित करण्यात नाही असे लेखी आश्वासन शासनाच्यावतीने देण्यात आल्यानंतर रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील खापरी नदीवर गेली दोन वर्षांपूर्वी वाकी खापरी धरण बांधण्यात आले आहे.या धरणात यावर्षी पूर्ण पाणी साठा करण्यात येणार असल्याने या धरणाचे गेट बंद करण्यात आले आहे.मात्र या गेट बंदला भावली ग्रामस्थांचा कडवा विरोध आहे. हे गेट बंद केल्याने गावात पाणी शिरणार असल्याने हे गेट तात्काळ उघडण्यात यावे अशी मागणी करूनही गेट उघडण्यात न आल्याने भावली ग्रामस्थांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली घोटी येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचे निश्चित केले होते.
दरम्यान आंदोलनाची दखल घेत इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरनाळे,धरणाचे कार्यकारी अभियंता केतन पवार,पिळोदेकर आण िग्रामस्थ यांची घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी घोटी पोलीस ठाण्यात बैठक घेतली.या बैठकीत धरणाच्या अधिकाऱ्यांनी सदर धरणाचे पाणी भावली गावात येऊ देणार नाही असे ठोस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.दरम्यान आंदोलकांनी सिन्नर फाट्यावर ठिय्या मांडीत आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली.यावेळी घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी आंदोलकात आणि धरण अधिकारी, महसूल विभागाच्या अधिकाºयांमध्ये मध्यस्थी करीत हे आंदोलन मागे घेण्यासाठी सुवर्णमध्य काढला. दरम्यान शासनाने योग्य आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले .या आंदोलनात श्रमजीवीचे राज्य सरचिटणीस विजय जाधव,सरचिटणीस भगवान मधे, संतोष ठोंबरे,तालुकाध्यक्ष संजय शिंदे,लता मेंगाळ, सुनील लोहरे, बाळू गावंडा,सीताराम गावंडा, शांताराम भगत,नीता गावंडा, तुकाराम खोडके,,यांच्यासह भास्कर पाचरणे, भगवान पाचरने,भावडू काळचिडे,अनुसया काळचिडे,लता बच्चे,तुकाराम बच्चे,तुकाराम शिंदे,कचरू पाचरने आदी सहभागी झाले होते.