बळीराजांनी केले हत्ती नदीचे विधिवत जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 19:23 IST2021-08-07T19:20:15+5:302021-08-07T19:23:46+5:30
कंधाणे : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील पठावा लघू प्रकल्प धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्याद्वारे पाणी हत्ती नदीतून प्रवाहित झाले आहे. हे पाणी कंधाणे व विंचुरे हद्दीत पोहोचताच येथील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करीत या भागासाठी जीवनदायी ठरत असलेल्या हत्ती नदीचे सटाणा बाजार समितीचे संचालक संजय बिरारी यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले.

हत्ती नदीचे जलपूजन करताना संजय बिरारी, अमृता बिरारी, प्रमोद बिरारी, मनोहर बिरारी, पंकज गायकवाड, शशिकांत गायकवाड, नानाजी गायकवाड, हेमंत बच्छाव, नाना भामरे, राजेंद्र गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, रावसाहेब गायकवाड.
कंधाणे : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील पठावा लघू प्रकल्प धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्याद्वारे पाणी हत्ती नदीतून प्रवाहित झाले आहे. हे पाणी कंधाणे व विंचुरे हद्दीत पोहोचताच येथील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करीत या भागासाठी जीवनदायी ठरत असलेल्या हत्ती नदीचे सटाणा बाजार समितीचे संचालक संजय बिरारी यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले.
बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आरम व हत्ती नदींना या भागातील जीवनदायिनी म्हणून ओळखले जाते. या नदीच्या पाण्यावर या भागातील हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येत असते. त्याचबरोबर या दोन्ही नद्यांवर या भागातील अनेक गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहे. या नद्यांना पाणी तर गावातील नागरिकांना मुबलक पाणी असे समीकरणच पिढ्यानपिढ्या या भागात रूढ झाले आहे. हत्ती नदीवर या भागातील जोरण, मोरकुरे, तळवाडे दिगर,किकवारी, विंचूरे, वटार, औंदाणे, तरसाळी, गावांचा पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहे. तसेच या नदीच्या पाण्यावर या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असते. बऱ्याचशा शेती क्षेत्राला या नदीच्या पाण्याच्या सिंचनामुळे अप्रत्यक्षरित्या फायदा होत असतो. हत्ती नदी किती महिने वाहते यावर या भागातील पीकपेरांचे भवितव्य बळीराजा ठरवत असतो. या नदीच्या पाणी सिंचनामुळे, कंधाणे, जोरण, विंचुरे, वटार, तळवाडे दिगर, किकवारी,वटार, चौंधाणे या भागातील शेती सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होते. या नदीच्या पाण्यामुळेच या भागात आर्थिक सुबत्ता नांदत आहे, हे भाकीत करणे वावगे ठरणार नाही. त्यामुळेच दरवर्षी या भागातील बळीराजा पावसाळ्यात हत्ती नदीच्या पाण्याची चातकासारखी प्रतीक्षा करीत असतो.
गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वीच या भागात होत असलेल्या रिमझिम पावसाच्या पाण्यावर पठावा धरण भरले आणि सांडवा ओसंडून हत्ती नदीच्या पात्रात पाणी प्रवाहित झाले. हे पाणी गेल्या दोन दिवसांपासून कंधाणे व विंचुरे परिसरात दाखल झाले होते. पाणी या भागात पोहोचताच संजय बिरारी, वसाकाचे माजी संचालक अमृता बिरारी, सोसायटीचे माजी सभापती प्रमोद बिरारी, मनोहर बिरारी, पंकज गायकवाड, शशीकांत गायकवाड, नानाजी गायकवाड, हेमंत बच्छाव, नाना भामरे, राजेंद्र गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, रावसाहेब गायकवाड या शेतकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून हत्ती नदीचे जलपूजन करण्यात आले. या परिसरात जोरदार पाऊस झाला नसल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग पसरले आहेत. एका बाजूला दमदार पावसाअभावी चिंतेचे वातावरण असतानाच हत्ती नदीला पाणी आल्याने गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजाच्या चिंतातुर चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पसरले आहे.
हत्ती नदीवर आमच्या भागातील शेती व्यवसायाबरोबर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहे. या भागात अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसून रिमझिम पावसावर पेरणी झाली आहे. या भागाला अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा असून हत्ती नदीला पाणी आल्याने खरिपाबरोबरच रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
- संजय बिरारी, संचालक, बाजार समिती सटाणा
फोटो - ०७ कंधाणे १