कृत्रिम पाणीटंचाई; मनपा आयुक्तांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:09 IST2019-06-02T23:54:51+5:302019-06-03T00:09:30+5:30
प्रभाग क्रमांक तीसमधील संस्कृती अव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये अत्यंत कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत असून, स्वखर्चाने पाणी आणावे लागत आहे.

कृत्रिम पाणीटंचाई; मनपा आयुक्तांना निवेदन
इंदिरानगर : प्रभाग क्रमांक तीसमधील संस्कृती अव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये अत्यंत कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत असून, स्वखर्चाने पाणी आणावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचे निवेदन प्रभागाचे नगरसेवक श्याम बडोदे यांनी स्थानिक नागरिकांसमवेत महापालिका आयुक्तांना दिले.
संस्कृती अव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये सुमारे २२ कुटुंबे राहतात. या परिसरात तीन इंची जलवाहिनी असून, गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने टँकर मागवावा लागत आहे. मात्र या पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही.
पाण्यासाठी वणवण
ऐन उन्हाळ्यात परिसरातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यामुळे आर्थिक व मानसिक त्रासास परिसरातील महिला वर्गाला सामोरे जावे लागत आहे. महापालिका आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा नागरिकांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा श्याम बडोदेंसह नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.