नैमित्तिक करारातून बसला ६८ लाखांचे उत्पन्न
By Admin | Updated: May 9, 2014 23:34 IST2014-05-09T23:01:50+5:302014-05-09T23:34:13+5:30
एसटी : विशेष अभियानातून ४७ लाखांचे उत्पन्न

नैमित्तिक करारातून बसला ६८ लाखांचे उत्पन्न
एसटी : विशेष अभियानातून ४७ लाखांचे उत्पन्न
नाशिक : लग्नकार्य आणि सहल यांसारख्या विशेष नैमित्तिक वाहतुकीतून महामंडळाला ६८ लाख एक हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यासाठी डिसेंबर ते मार्च महिन्याच्या विशेष मोहिमेत ४७ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, ते उद्दिष्टाच्या ८० टक्के आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा विविध सहलींसाठी तसेच घरगुती कारणांसाठी नैमित्तिक करार केला जातो. त्यासाठी विविध योजना आणि सवलतींचाही वर्षाव केला जातो. त्यात विविध कारणांसाठी बसेस भाड्याने घेण्याचे प्रमाणही मोठे असते. लग्नकार्यात अणि इतर प्रवासासाठी महामंडळाच्या बसेसला प्राधान्य दिले जाते. त्यात वाढ करण्यासाठी महामंडळाने कमीत कमी अंतरावरसुद्धा बसेस भाड्याने देण्याची योजना आखली. त्यासाठी १ डिसेंबर ते ३१ मार्च या काळात विशेष योजनाही राबविण्यात आली. या काळासाठी ५८ लाख ६५ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८१ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात वाहतूक विभागाला यश आले. त्यांनी मार्चअखेरपर्यंत वाहतुकीतून ४७ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. यासाठी त्यांनी १४९ करार केले व एक लाख ३२ हजार ७६३ किलोमीटर अंतर कापले. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत १४ करारांतून २० लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
खासगी वाहतुकीचा अडसर
परिवहन महामंडळ नैमित्तिक करारासाठी सुरक्षित वाहतूक प्रदान करीत असली, तरी वाहतूक करणार्या अनेक कंपन्या गाडी उभी ठेवण्यापेक्षा मिळेल त्या दरात प्रवाशांची वाहतूक करतात. त्यामुळे महामंडळापेक्षा कमी दरात मिळणार्या वाहतूक सेवेला प्रवासीही प्राधान्य देतात. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नवाढीला अडसर निर्माण होतो.
महामंडळाचा सुरक्षित प्रवास
महामंडळाचा प्रवास हा सुरक्षित असतो. कमीत कमी अंतरासाठीही बस भाड्याने दिली जाते. प्रशिक्षित चालक आणि विम्याने सुरक्षित वाहतूक हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नागरिकांनी नैमित्तिक कारणासाठी महामंडळाच्या बसेसचा वापर करावा, असे महामंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले.