सातपूर : पावसाळ्यातील खबरदारीचा उपाय म्हणून विभागातील ११ धोकादायक घरांच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, नासर्डी नदीकाठावरील ३२० घरांनाही पुरामुळे नुकसान होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. सातपूर विभागातील सातपूर गाव, पिंपळगाव बहुला गावठाण, आनंदवली गावठाण येथील धोकादायक घरांची माहिती घेऊन अशा ११ धोकादायक घरांना महापालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात घर पडण्याची शक्यता गृहीत धरून ही घरे उतरवून घ्यावीत, असे सूचित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात नासर्डी नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील झोपड्या आणि घरांनी सावधानता बाळगावी. नुकसान झाल्यास संबंधितांनाच जबाबदार धरण्यात येईल, असे सूचित करण्यात आले आहे. नदीकाठावरील अशा ३२० घरांना महापालिकेच्या वतीने सूचनापत्र देण्यात आले आहे. अजूनही काही धोकेदायक घरांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सातपूर विभागीय कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी महेंद्र पगारे यांनी दिली. (वार्ताहर)