दुर्गम भागातील आरोग्य केंद्रात औषधींची वाणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 12:30 PM2020-08-16T12:30:46+5:302020-08-16T12:30:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये औषधे नाहीत. पुरवठा वेळेवर होत नाही. रुग्ण येतात परंतु खाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये औषधे नाहीत. पुरवठा वेळेवर होत नाही. रुग्ण येतात परंतु खाली हात परत जातात. अशा तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आल्या. याबाबत चौकशी करण्याच्या सुचना अध्यक्षांनी दिल्या.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. सभेला उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सभापती अभिजीत पाटील, जयश्री पाटील, रतन पाडवी, निर्मला राऊत उपस्थित होते. बैठकीत आरोग्य व शिक्षण विषयावर चर्चा करण्यात आली.
दुर्गम भागात औषधपुरवठा वेळेवर होत नसल्याची तक्रार सदस्य सी.के. पाडवी यांनी केली. त्यावर रुग्णकल्याण समितीला अत्यावश्यक असतील तीच औषधी घ्यावीत असे निर्देश देण्यात आले आहेत. जेथे नसतील तेथे औषधी पाठविली जातील असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी सांगितले. अध्यक्षा वळवी यांनी असे प्रकार होऊ नये असे सांगत चौकशीच्या सूचना त्यांनी दिल्या. तर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सर्व आरोग्य केंद्रातील औषधींचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या. सर्पदंशाची औषधी, लस जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विजय पराडके यांनी केली. दरम्यान नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील आरोग्य केंद्रात कर्मचारी राहत नसल्याची तक्रार अर्चना गावीत यांनी केली.
शिक्षण विभागाची माहिती देतांना प्राथमिक शिक्षणाधिकारी रोकडे यांनी आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात १२५ शिक्षक येत आहेत तर जिल्ह्यातून ९९ शिक्षक जात आहेत. या येणाऱ्या शिक्षकांना १६६ रिक्त पदांवर सामावून घेतले जाणार आहे.
समुपदेशन पद्धतीने त्यांना नियुक्ती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भरत गावीत यांनी पेसा कायद्याप्रमाणे येणाºया शिक्षकांना अतिदुर्गम भागात नियुक्ती देण्यात यावी. तेथील बदलीपात्र शिक्षकांना सोप्या क्षेत्रात आणावे अशी मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात त्यांना प्राधान्याने नियुक्ती दिली जाणार असल्याचे सांगितले.
बैठकीत देवमन पवार, धनराज पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.