देवीच्या मुखदर्शनावर मानावे लागले समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 12:09 PM2020-10-18T12:09:09+5:302020-10-18T12:09:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर धार्मिक स्थळे बंद असल्याने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांना दर्शनाविना परत फिरावे लागल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर धार्मिक स्थळे बंद असल्याने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांना दर्शनाविना परत फिरावे लागल्याचे चित्र शहरातील देवी मंदिरांवर दिसून आले. काहींनी दूरूनच मुख दर्शन घेऊन समाधान मानले. दरम्यान, शहरातील सर्वच मंदिरांवर वाढीव पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.
नवरात्रोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. यंदा कुठलाही उत्साह नवरात्रोत्सोवात दिसून येत नसल्याची स्थिती आहे. मंदिर परिसरांमध्ये सामसूम आहे. अशा ठिकाणी पुजारी आणि बंदोबस्तावरील पोलिसांचे अस्तीत्व दिसून येत आहे.
यात्रा परिसरात सन्नाटा
नवरात्रोत्सात खोडाई माता यात्रोत्सवानिमित्त यशवंत विद्यालयाचे पटांगण व मंदिर परिसरात गजबजलेले असते. विविध व्यावसायिकांची आणि भाविकांची रेलचेल असते. परंतु यंदा यात्रोत्सवच नसल्यामुळे या भागात सामसूम आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरीकेटींग लावले आहे.
मंदीर परिसरात तेथील पुजारी आणि सेवेकरी यांच्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. टेलिफोन कार्यालय आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रस्त्यांवर बॅरीकेटींग लावली आहे. या ठिकाणी पोलीसाची राहुटी लावण्यात आली आहे. बंदोबस्त येथे तैणात राहणार आहे.
पहाटे महिला भाविक दाखल
नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असल्याने शहरातील विविध भागातून महिला पायीच दर्शनासाठी पहाटे पाच वाजेपासून दाखल होत होत्या. परंतु बॅरीकेटींग पाहून त्यांना दुरूनच कळस दर्शन घ्यावे लागत होते. मंदिरे बंद असल्याने दर्शनासाठी कुणीही येऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. खोडाईमाता मंदिरासह वाघेश्वरी मंदीर, संकष्टादेवी, लक्ष्मीदेवी मंदीर या मंदिरांवर देखील अशीच स्थिती दिसून आली.
लहान व्यावसायिकांना बसला आर्थिक फटका...
यात्रोत्सवासह मंदिरे बंद असल्यामुळे विविध व्यावसायिकांना त्याचा फटका बसला आहे. फुलं, पुजेचा सामान, प्रसाद विक्रेते यांच्यासह इतर वस्तू विक्रेत्यांचा त्यात समावेश आहे.
जिल्ह्यातील सर्वच मंदिर परिसरात वाढीव पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आलेला आहे. भाविकांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
सार्वजिनक गरबा मंडळांकडून देखील यंदा कुठलाही सार्वजिनक कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा मंडळाचे परिसर आणि चौकात सामसूम असल्याचे चित्र आहे.