लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चालक आणि वाहक एसटीच्या रथाचे दोन चाके असून प्रत्येक बसमधील ५० प्रवाशांचे सुरक्षा रक्षक असल्याने केवळ वाहतूक सप्ताहपुरते नियमांची अंमलबजावणी न करता कायमस्वरूपी पालन करणे गरजेचे आहे असे मत निवासी नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी व्यक्त केले.राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे राबविण्यात येणाऱ्या सुरक्षितता मोहीम पंधरवाड्याचे उद्घाटन गोपाळ पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगारप्रमुख मनोज पवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागीय कार्यशाळेचे भांडार अधिकारी सी. एस. पोतदार, तलाठी निलेश मराठे, नंदुरबार तालुका ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, वाहतूक निरीक्षक सचिन पाटील उपस्थित होते.आगारप्रमुख मनोज पवार म्हणाले की, गतवर्षाच्या तुलनेत नंदुरबार आगारात यावर्षी अपघाताच्या प्रमाणात घट झाली आहे. विनाअपघात कर्तव्य बजावणाºया उत्कृष्ट चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांचा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी राज्य परिवहन महामंडळातर्फे सन्मान करण्यात येतो.सर्वच आगारातर्फे एसटी बसची वेगमर्यादा ठरवल्यामुळे सुरक्षेला प्राधान्य देण्यात येते. सुरक्षा पंधरवडा अंतर्गत इंधन बचाव अभियान राबविण्यात येत आहे. असेही पवार यांनी सांगितले.सूत्रसंचालन ललित सूर्यवंशी यांनी तर आभार प्रशांत गुजराथी यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन वरिष्ठ लिपिक राजेंद्र पाटील, दिलीप वळवी, सलीम मलिक यांनी केले.
केवळ सप्ताहापुरतीच नियमांची अंमलबजावणी व्हायला नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:59 PM