संचारबंदीतही तहान भागविण्यासाठी जलदूतांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 12:57 PM2020-04-10T12:57:18+5:302020-04-10T12:57:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे संचारबंदी आणि दुसरीकडे शहरावसीयांना नियमित वेळेवर पाणी पुरवठा व्हावा यासाठी धडपड करणारे कर्मचारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकीकडे संचारबंदी आणि दुसरीकडे शहरावसीयांना नियमित वेळेवर पाणी पुरवठा व्हावा यासाठी धडपड करणारे कर्मचारी असे चित्र दिवसभरात नंदुरबारातील विविध भागात दिसून येते. अत्यावश्यक सेवेतील हा वर्ग थेट पंपींग स्टेशनपासून ते २५० पेक्षा अधीक झोनमध्ये वेळेवर पाणी पुरवठा करण्यासाठी राबतो आहे. पहाटे चार वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत अविरत सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांविषयी शहरवासी समाधान व्यक्त करीत आहेत.
सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदीची स्थिती, लोकं घरात बसूनच या स्थितीचा सामना करीत आहेत. घरात बसलेल्या लोकांना वेळेवर पाणी पुरवठा व्हावा. नियमित आणि पुरेसे पाणी मिळावे याची खबरदारी पालिकेचा पाणी पुरवठा विभाग नियमितपणे घेत आहे. यासाठी पाणी पुरवठा विभागाचे १०० पेक्षा अधीक कर्मचारी दिवसरात्र राबत आहेत.
अशी आहे पाणीपुरवठा सिस्टिम
नंदुरबारातील नळ जोडणीधारकांची संख्या जवळपास १६ हजारा पेक्षा अधीक आहे. या नळजोडणीधारकांना झराळी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून दररोज किमान ८० लाख लिटर पाण्याचे वितरण करण्यात येते. त्यासाठी पालिकेने शहराच्या चारही बाजूंना जवळपास १५ जलकुंभाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जाते. शहरात सर्वात जुनी पाण्याची टाकी ही साक्रीनाका परिसरातील आहे. याशिवाय टिळक विद्यालयामागे, जिल्हा परिषद कार्यालयाजवळ, माळीवाडा, धुळेनाका, बुस्टरपंप, नवनाथ टेकडी, शांतीनगर, योगेश्वरनगर, नागाईनगर, देवमोगरा कॉलनी, परदेशीपुरा टेकडी, विरलविहार, हाटदरवाजा आदी ठिकाणी जलकुंभ आहेत.
याशिवाय कलामंदीर आणि रंगारी विहिरीच्या कुपनलिकेतून अग्निशमनबंब, टँकर भरले जातात.
१०० पेक्षा अधीक कर्मचारी
पाणी पुरवठा विभागात १०० पेक्षा अधीक कर्मचारी कार्यरत आहेत. यात ७५ वॉलमन असून सात कर्मचारी झराळी पंपींग स्टेशनवर, ६ कर्मचारी जलशुद्धीकरण केंद्रावर तर इतर २५ कर्मचारी इतर कामासाठी आहेत. पाणी पुरवठा सेवा अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्यामुळे या सर्व कर्मचाºयांना पालिकेने मास्क व संचारबंदी काळात कामासाठीचे ओळखपत्र दिले आहेत.
२४ तास काम
पंपींग स्टेशनवरून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आणने, तेथून पाणी शुद्ध करून ते शहरातील १६ जलकुंभांमध्ये आणून तेथून झोननुसार पाणी पुरवठा करणे अशी कामे पाणी पुरवठा कर्मचाºयांना करावी लागतात. त्यासाठी २४ तास हा विभाग कार्यरत असतो.
१७ हजार नळ कनेक्शन
शहरात घरगुती, कमर्शियल आणि मिटरद्वारे पाणी देण्याचे एकुण १७ हजार नळ कनेक्शन आहेत. या कनेक्शनधारकांना पाणी पुरवठ्यासाठी एकुण २५० पेक्षा अधीक झोन करण्यात आले आहेत. पहाटे चार वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत या झोनद्वारे पाणी पुरवठा अविरत सुरू असतो. अर्थात झोनप्रमाणे एक दिवसाआड व ४५ ते ५५ मिनिटे पाणी पुरवठा केला जात असतो.
२५० झोनद्वारे सोडले जाते पाणी..
नंदुरबारातील विभागनिहाय व लोकसंख्या आणि विस्तार निहाय झोन पाडण्यात आले आहेत. काही झोन मोठे तर काही झोन मोठे आहेत. मुख्य झोन व त्याचे उपझोन असे सर्व मिळून तब्बल २५० झोन आहेत. १६ जलकुंभद्वारे त्यातून पाणी सोडले जाते. त्याकरीता ७५ वॉलमन कार्यरत आहेत. ते आपल्या झोननिहाय ड्युटी बजावत असतात.