नंदुरबारच्या लाल मिरचीचा हंगाम यंदा फिका फिका...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST2021-03-17T04:31:11+5:302021-03-17T04:31:11+5:30
नंदुरबार : राज्यात सर्वदूर प्रसिद्ध असलेली नंदुरबारची मिरची यंदा ‘फिकी’ पडल्याचे चित्र आहे. अवेळी झालेल्या पावसाने मिरची उत्पादनाचे समीकरण ...

नंदुरबारच्या लाल मिरचीचा हंगाम यंदा फिका फिका...
नंदुरबार : राज्यात सर्वदूर प्रसिद्ध असलेली नंदुरबारची मिरची यंदा ‘फिकी’ पडल्याचे चित्र आहे. अवेळी झालेल्या पावसाने मिरची उत्पादनाचे समीकरण बिघडविल्याने यंदा निम्म्यापेक्षाही कमी उत्पन्न आले असून, त्यामुळे मिरची उत्पादक अडचणीत आले आहेत. तर दुसरीकडे या मिरचीवर सुरू असलेला येथील मिरची पावडर उद्योगही थंडावला असून, उद्योजकांना परराज्यातून मिरची मागवावी लागत आहे.
मिरचीचे आगार म्हणून नंदुरबारची ओळख आहे. गुुंट्टूर नंतर देशात नंदुरबारच्या मिरचीला मागणी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रतिकूल हवामान, मिरचीला मिळणारा कमी भाव व इतर कारणांनी येथील उत्पादक दुसऱ्या पिकाकडे वळले. त्यामुळे मिरची उत्पादन दरवर्षी कमी कमी होत आहे. यंदा सुमारे आठ हजार क्षेत्रात मिरचीची लागवड झाली होती. दरवर्षी या भागातील शेतकरी एकरी १०० क्विंटलपेक्षा अधिक मिरची उत्पादित करतात. मात्र यंदा अवेळी पावसामुळे मिरचीचे पीक खराब झाले. पिकावर व्हायरस आल्याने उत्पादन जेमतेमच निघाले आहे. त्यातून अनेक शेतकऱ्यांचा खर्चही भरून निघालेला नाही.
नंदुरबार बाजार समितीही मिरची खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी दरवर्षी हंगामात ८ ते १० लाख क्विंटल मिरचीची खरेदी होत होती. गेल्यावर्षी या ठिकाणी अडीच लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली होती. यंदा मात्र आतापर्यंत जेमतेम ७६ हजार क्विंटल खरेदी झाली असून, हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. सध्या बाजारात जेमतेम एक ते दीड हजार क्विंटल मिरचीची आवक आहे. मिरची कमी असल्याने भाव मात्र चांगला मिळत आहे. साधारणत: दोन हजार ४०० ते चार हजार रूपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव आहे. अर्थात भाव असला तरी उत्पादन कमी झाल्याने उत्पादक चिंतेत आहेत.
पथारींवर अनेकांना रोजगार
मिरची खरेदी करून व्यापारी ती वाळविण्यासाठी पथारी तयार करतात. या पथारींवर रोज ५०० पेक्षा अधिक मजुरांना रोजगार मिळतो. मिरची खुडणे, पसरविणे, गोणीत भरणे अशी कामे मजुरांना करावी लागतात. त्यामुळे रोज या पथाऱ्यांवर अनेक हातांना काम मिळत आहे. सध्या १० पथाऱ्या कार्यरत आहेत.
राेज ५० लाखांची उलाढाल
नंदुरबारात मिरचीवर मोठे अर्थचक्र अवलंबून आहे. येथे मिरची पावडर उत्पादित करणारे एकूण ३५ उद्योग कार्यरत असून, रोज तेथे २० टन मिरची पावडर तयार होते. ही पावडर महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान व इतर राज्यात विक्रीला जाते. त्यामुळे रोज सुमारे ५० लाखांची उलाढाल त्यात होते. या शिवाय मिरची खरेदी-विक्रीतही लाखोंचा व्यवहार होतो. या उद्योगांमध्येदेखील सुमारे ५०० पेक्षा अधिक मजुरांना कायमचा रोजगार मिळाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात यंदा मिरचीचे उत्पादन कमी आल्यामुळे मिरची उद्योगाला स्थानिक मिरची अपुरी पडत आहे. त्यामुळे उद्योग क्षमतेने चालविण्यासाठी मिरची पावडर उद्योजकांना आंध्रप्रदेश व कर्नाटक मधून मिरची मागवावी लागत आहे. - जयेश बांगड, सचिव, मिरची पावडर उत्पादक असोसिएशन, नंदुरबार