पावसामुळे शेतकऱ्यांची ‘मेहनत’ पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:22 PM2020-09-24T12:22:58+5:302020-09-24T12:23:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ शेतात पाणी साचल्याने पिके ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ शेतात पाणी साचल्याने पिके सडू लागली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास मोठ्या नुकसानीची भिती व्यक्त होत आहे़
गत आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे़ सोबत वादळी वारेही जोर धरत असल्याने पिके जमीनदोस्त झाली आहेत़ ऊस, कापूस, सोयाबीन, ज्वारी, भात आदी धान्य पिकांसह तेलबिया आणि कडधान्य पिकांची वाताहत झाली आहे़ या पिकांचे पंचनामे करण्यासाठी मंगळवारपासून महसूल आणि कृषी विभागाचे पथक नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडून येत्या चार दिवसात पंचनामे पूर्ण करुन अहवाल जिल्हा प्रशासनाला सोपवला जाईल़ दरम्यान नंदुरबार, तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यात पावसामुळे कोरड आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ येत्या दोन दिवसात पाऊस कायम राहिल्यास हाती येऊ शकणाऱ्या उत्पन्नापासूनही शेतकरी मुकणार असल्याची माहिती शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे़ दररोज दुपारी चार ते मध्यरात्री १२ पर्यंत वादळी वाºयासह पाऊस येत आहे़ जिल्ह्यात १ लाख २२ हजारपेक्षा अधिक क्षेत्रात लागवड केलेल्या कापूस पिकाला बोंडे आली आहेत़ वादळामुळे बोंडे झाडाखाली कोसळून नुकसान झाले आहे़ दुसरीकडे धान्य पिके जमिनदोस्त झाली आहेत़ आधीच शेतात साचलेल्या पाण्यात कणसासह कडबाही सडू लागला असल्याचे चित्र आहे़ ज्याठिकाणी कापूस बोंडे फूटून बाहेर आली होती़ त्या शेतांमध्ये पाणी साचले आहे़ परिणामी झाडांवर मर येऊन फुटलेला कापूस सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ हे सर्व नुकसान पाहून शेतकरी हताश झाले आहेत़
नंदुरबार तालुक्यातील कोरीट महसूल मंडळातील गावांमध्ये शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने काही ठिकाणी पिके वाहून गेली आहेत़ अनेक ठिकाणी आठ दिवसांपासून जमिन पाण्याखाली गेली असल्याने नुकसान वाढत आहे़ या नुकसानीचा आढावा प्रशासनाने घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे़
जिल्ह्यातील एकूण ३६ महसूली मंडळात सलग सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती आहे़ या पार्श्वभूमीवर कृषी विभाग कृषी सहायक व पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून पंचनाम्यांच्या प्रक्रियेला गती देत आहेत़