नंदुरबारात विविध आजारांनी दीड हजार बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:12 IST2019-04-11T12:11:48+5:302019-04-11T12:12:20+5:30
दोन वर्षातील स्थिती : उपचारांची सोय असूनही दुर्लक्ष

नंदुरबारात विविध आजारांनी दीड हजार बालकांचा मृत्यू
नंदुरबार : आरोग्य सुविधा आणि शासकीय योजनांचा रतीब लागणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात विविध आजारांमुळे गेल्या दोन वर्षात शून्य ते पाच वर्ष वयाची १ हजार ७२७ बालके दगावल्याचा अहवाल आहे़ यातील निम्मी बालके ही शहरी भागात उपचार घेताना दगावल्याची माहिती असून लागण झालेले आजार हे बरे होण्यासारखेच होते, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे़
१ जिल्हा, दोन उपजिल्हा आणि ११ ग्रामीण रुग्णालये, ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २९० उपकेंद्रांंसह सातपुड्यात बोटीचे दवाखाने, फिरते पथकांद्वारे आरोग्य सेवा दिली जाते़ कुपोषणामुळे संवेदनशील असल्याने जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांसाठी सतत मोहिमा राबवल्या जातात़ यातून कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याच्या आकडेवारीतील तफावत नेहमी चर्चेचा विषय ठरत असल्याने हा मुद्दा कायम आहे़ परंतू जिल्ह्यात या व्यतिरिक्त विविध आजारांनी होणारे बालकांचे मृत्यू चिंतेचा विषय असून वेळीच उपचार न मिळणे व आजारांबाबत जनजागृतीचा अभाव यातून बालकांना प्राण गमवावे लागल्याचे २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षात समोर आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे़ २०१८-१९ या वर्षात न्यूमोनिया या आजाराने ८५, अवेळी जन्म आणि वजनात कमी यातून १४८, अतीसार आणि इतर आजारातून ६, जखमेत जंतूसंसगार्गतून ११६, श्वसनाच्या विकारातून ११६, जन्मजात विकृतीतून ३१, श्वसनाच्या त्रासातून १०१, अपघातातून जखमी झालेले १०, पाण्यात बुडाल्याने १३, विषबाधा आणि सर्पदंशाने ७, अकस्मात ५, मेंदूज्वराने ११ तर इतर अनोळखी आजारांनी २१५ अशा एकूण ८४४ बालकांचा मृत्यू झाला़ शून्य ते ५ वर्ष वयोगटातील ही बालके आहेत़ तालुकानिहाय आकडेवारीनुसार नंदुरबार ५०, नवापूर ४४, तळोदा ११, शहादा ४४, अक्कलकुवा १२६ तर धडगाव तालुक्यात सर्वाधिक १५१ बालकांचा बळी गेला आहे़ ग्रामीण भागातून शहरी भागात रुग्णालयात उपचार सुरु असताना ४१८ तर ग्रामीण भागात घरीच बळी गेलेल्या बालकांची संख्या ही ४२६ आहे़ एकाच वर्षात ८४४ बालकांचा बळी गेल्याने या आरोग्य सेवेबाबतचे गांभिर्य वाढले आहे़ २०१७-१८ या वर्षातही हीच गत असल्याचे चित्र आहे़ या वर्षात न्यूमोनिया ७०, कमी वजनामुळे १८४, अतीसार १४, जखमेतील जंतूसंसर्गामुळे १३९, श्वसन विकारामुळे १०८, विकृतीने ५०, श्वसनाच्या त्रासाने ७५, अपघातात ११, बुडून ६, सर्पदंश आणि विषबाधेने १५, मेंदूज्वराने ९, अकस्मात ८ तर इतर आजारांनी १९४ अशा अशा ८८३ बालकांचा मृत्यू झाला होता़