ग्रामीण भागात ६० अलगीकरण कक्ष तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:30 AM2021-04-18T04:30:02+5:302021-04-18T04:30:02+5:30
लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींवर येथे उपचार करण्यात येणार आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी अलगीकरण कक्षांच्या नियोजनाबाबत ...
लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींवर येथे उपचार करण्यात येणार आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी अलगीकरण कक्षांच्या नियोजनाबाबत गट विकास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एकही बाधित व्यक्ती गावात न फिरता किंवा घरी न थांबता अलगीकरण कक्षात उपचार घेईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. लक्षणे नसलेले कोरोना बाधितांवर वेळेवर उपचार होण्यासाठी फिरत्या पथकामार्फत कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशा नागरिकांना इतर नागरिकांपासून तात्काळ वेगळे करावे, असे निर्देश त्यांनी दिले. सदर सर्व अलगीकरण कक्ष त्या-त्या ग्रामपंचायतीमार्फत चालवली जाणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णाची दिवसातून २-३ वेळा तपासणी करून औषधोपचार करतील. रुग्णांना चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना गावातच किंवा जवळच्या प्राथमिक केंद्राच्या ठिकाणी उपचार मिळणार आहेत.आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी स्वत:हून अलगीकरण कक्षात दाखल झाल्यास इतरांना होणारा संसर्ग टाळता येईल आणि कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. तसेच वेळेवर उपचार झाल्यास बाधित व्यक्तीची प्रकृती अधिक खराब होणार नाही. मंगळवार पर्यंत या कक्षात ५० बेड्सची व्यवस्था करण्यात येणार असून त्यानंतर गरजेनुसार १०० पर्यंत बेड्स वाढविण्यात येणार आहेत. अशाप्रकारे येत्या काळात प्रा.आ.केंद्र स्तरावर सहा हजार बेड्सची क्षमता लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी होऊ शकेल. जिल्हास्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी शेखर रौंदळ यांचेकडे अलगीकरण कक्षाच्या नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली असून आरोग्य विभाग, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रा.पं.सदस्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नियोजनावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक समन्वयक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे अशी माहिती श्री.गावडे यांनी दिली आहे. ग्रामस्थांनी कोरोनाबाधित व्यक्ती अलगीकरण कक्षातच उपचार घेईल यासाठी सहकार्य करावे. तसेच कोरोनामुळे प्रकृतीवर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी ४५ वर्षावरील व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.