महत्वाच्या विभागांचीच बैठकीकडे पाठ, पदाधिकारी झाले नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 01:07 PM2020-11-13T13:07:14+5:302020-11-13T13:07:52+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पंचायत समितीची मासिक बैठक गुरुवारी सभागृहात घेण्यात आली. यावेळी आदिवासी विकास प्रकल्प, वनविभाग ...
n लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : पंचायत समितीची मासिक बैठक गुरुवारी सभागृहात घेण्यात आली. यावेळी आदिवासी विकास प्रकल्प, वनविभाग व वीज वितरण या तीन यंत्रणांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. पुन्हा त्यांना नोटिसा बजावण्याची सूचना प्रशासनास दिली. त्यांच्या सततच्या गैरहजेरीचा मुद्दा डीपीडीसीच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तळोदा पंचायत समितीची बैठक गुरुवारी सकाळी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती यशवंत ठाकरे होते. सुरुवातीस बांधकाम, आरोग्य, पशूसंवर्धन, एस.टी. महामंडळ, कृषी, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, घरकुले अशा विविध विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सदस्यांनी वनविभाग, आदिवासी विकास प्रकल्प व वीज वितरण विभागाचे प्रश्न उपस्थित केले होते. परंतु या तिन्ही यंत्रणांचा कोणीही अधिकारी अथवा प्रतिनिधी हजर नव्हता. त्यामुळे सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सभेचे पत्र दिले होते का? असा सवाल सभापतींनी प्रशासनास केला. तेव्हा यंत्रणांनी पत्र देण्यात आले होते तरीही नेहमीप्रमाणे या विभागांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा नोटिसा पाठवून खुलासा मागवण्याची सूचना पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. वास्तविक या तिन्ही यंत्रणांकडे ग्रामीण भागातील जनतेच्या वैयक्तिक व सामूहिक प्रश्न असतात. ते प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु सदर विभाग हेतूत: गैरहजर राहतात, असा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा जिल्हा विकास नियोजनाच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे सभापतींनी सांगितले.
प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक दिगंबर बोरसे यांनी केले. बैठकीला उपसभापती लताबाई वळवी, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहायक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे, पंचायत समिती सदस्य विजय राणा, चंदनकुमार पवार, सुमनबाई वळवी, सोनी पाडवी, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र पवार, पाणीपुरवठा विभागाचे जितेंद्र गिरसे, बांधकाम विभागाचे आर.बी. पवार, विस्तार अधिकारी आर.के. जाधव आदींसह इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
सदस्यांनी मांडल्या समस्या
दुर्गम भागातील गावांमध्ये अधिकारी, कर्मचारीच पोहचत नसल्याची तक्रार सदस्याने केली होती. त्यामुळे शासनाच्या योजना त्यांना मिळत नाही. शिवाय त्यांचे कामेदेखील होत नाही. विशेषत: याठिकाणी लाभार्थींना आहारही मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने त्यांचा प्रतिनिधी न पाठवता स्वतः अधिकाऱ्यानेच उपस्थित राहण्याची सूचना सदस्यांनी मांडली होती. त्यावेळी हजर रहाण्याबाबत संबंधितांना सूचना देण्याचे सूचित करण्यात आले. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका अत्यंत जीर्ण झाल्याने नेहमी नादुरुस्त होतात. त्यामुळे रुग्णांनाही तातडीने उपचार मिळत नाही. रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लावण्याचा मुद्दा विजय राणा यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याची सूचना सभापतींनी केली होती.