नवापुरात डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 14:06 IST2021-02-12T14:06:43+5:302021-02-12T14:06:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील प्रभाग क्रमांक सात व सहा मधील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा ...

नवापुरात डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील प्रभाग क्रमांक सात व सहा मधील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रस्त्यावर टाकलेले डांबर काढून निकृष्ट काम केले जात असल्याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर पालिका पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या कामावर जाऊन ठेकेदारामार्फत तात्काळ नव्याने डांबरीकरण करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याने ठेकेदाराने पुन्हा डांबरीकरण केले.
शहरातील गुजरगल्ली, शिवाजी रोड, कुंभारवाड्यातील नागरिकांनी रस्ता पाच ते सहा इंच खोदून नवीन व्यवस्थित डांबरीकरण करावे, अशी मागणी केली आहे. वर्षानुवर्षे रस्त्याचे काम करून जुनी घरे खोल गेल्यामुळे पावसाळ्यात घरात पाणी शिरत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यांनी या कामाला विरोध केला आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेवक व नगराध्यक्षा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व चांगल्या दर्जाचे डांबरीकरण केले जाईल, असे आश्वासन नागरिकांना दिले. या रस्त्याचे डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने शहरातील इतर रस्त्यांवर जास्त प्रमाणात डांबर टाकून चांगल्या दर्जाचे काम केल्याचाही दावा केलेला आहे व तसे व्हीडिओ त्यांनीही सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. दिवसभर नागरिक, ठेकेदार, पालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून आले. या भागातील काही दुकानदारांनी संध्याकाळी रस्त्यांवर नळीच्या सहाय्याने डांबरीकरणाचा कामावर पाणी मारण्याचा प्रताप केला.
नगरपरिषदेच्या अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक सहा व सातमध्ये रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे. नियमांना डावलून थातूरमातूर पध्दतीने रस्ता डांबरीकरणाचे काम होत असल्यामुळे हा निकृष्ट दर्जाचा रस्ता किती काळ तग धरणार, अशी तक्रार नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामास कंत्राटदाराने रविवारपासून सुरुवात केली. नवनीत लोहार यांच्या घरापासून ते कुंभारवाडापर्यत हा रस्ता अत्यंत वर्दळीचा व महत्वपूर्ण असल्यामुळे त्या रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक होते. कंत्राटदारामार्फत अंदाजे ५६ लाख रुपयांची कामे होत असताना देखभालीकरिता पालिका .प्रशासनाच्यावतीने एकही अधिकारी वा कर्मचारी उपस्थिती दर्शवत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. थातूरमातूर डांबर टाकून रस्ता कामास सुरुवात केली. कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य असल्यामुळे वर्दळीचा हा रस्ता किती दिवस तग धरणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगरसेवक व नागरिकांमध्येही शाब्दिक चमकम झाली.