आसना नदीतील पाण्याचा अंदाज चुकला अन् दोघांचा बुडून जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 19:26 IST2023-07-19T19:26:05+5:302023-07-19T19:26:15+5:30
अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरात आसना नदी पात्रातील घटना

आसना नदीतील पाण्याचा अंदाज चुकला अन् दोघांचा बुडून जीव गेला
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड): आसना नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजता घडली. राहुल रमेश आठवले (१७) आणि साई दशरथ चुनुरवार (१८ दोघे रा.कामठा नांदेड ) अशी मृतांची नावे आहेत.
अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरात आसना नदी पात्रात पोहण्यासाठी राहुल रमेश आठवले आणि साई दशरथ चुनुरवार आले. पाण्याचा अंदाज न आल्याने राहुल आठवले बुडू लागला. त्याला वाचवायला साई गेला. मात्र, दोघेही पाण्यात बुडाले. माहिती मिळताच घटनास्थळी गोदावरी जीवरक्षक दलाचे सय्यद नुर एकबाल, कालिदास खिल्लारे, शेख लतिफ दिपक कोमावार यांनी धाव घेत शोध घेतला. काही वेळात दोघांचे मृतदेह आढळून आले. विमानतळ पोलीस, अर्धापूर पोलीस व मयतांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अवैध उत्खननाने घेतला बळी...
आसना नदी पात्रात गेल्या काही दिवसापासून अवैध उत्खनन सुरू होते. या उत्खननामुळे नदी पात्रात अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. यात खड्ड्यांमुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू झाला. अवैध उत्खननामुळे दोघांचे बळी गेल्याची चर्चा नागरिकांत आहे.