नांदेड : शेतीचा फेर नावे करून देण्यासाठी संगनमत करून अर्जदाराकडून १६ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला तलाठ्यांच्या जोडगोळीला रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे. दरम्यान, एकाच दिवशी महसूलचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने खाबूगिरी करणारे महसुलातील अधिकारी, कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.
बदली झाल्यावरही जुन्या प्रलंबित प्रकरणाला कॅश करण्याच्या उद्देशाने तलाठी भाग्यश्री भीमराव तेलंगे व सुजाता शंकर गवळे या दोघींनी तयारी चालविली होती. मात्र अर्ज करूनही नियमानुसार असलेले काम करण्यासाठी होत असलेली पैशांची मागणी अर्जदारास मान्य नव्हती. भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने तक्रारदाराने एसीबी कार्यालय गाठून तक्रार नोंदवली. त्याची खात्री पटताच ३ जून रोजी गोकुंदा (ता. किनवट) येथे सापळा रचला. यावेळी तक्रारदाराने कामासाठी येत असल्याचे सांगितल्याने दोन्ही महिला तलाठ्यांनी पैसे घेण्याचे नियोजन केले. दरम्यान, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अर्जदाराने व्यवहारासाठी ठरलेली रक्कम चर्चा करून तलाठी गवळे यांना दिली. ती स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने दोन्ही महिला तलाठ्यांना ताब्यात घेतले. लाच प्रकरणात फसल्याचे लक्षात येताच, दोघींनाही रडू कोसळले. याप्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना ४ जून रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
धास्ती अन् दबक्या आवाजात चर्चाकिनवट तालुका जिल्ह्यापासून दूर व आदिवासीबहुल असल्याने गौण खनिज, समृद्ध वनसंपदा आहे. या माध्यमातून चंगळ करण्यासाठी अनेकजण येथे पोस्टिंग घेतात. महसूल कार्यालयात तर पैसे दिल्याशिवाय कोणाचेच काम करायचे नाही, असा शिरस्ता असल्याचे नागरिक खुलेआम बोलतात. लोकसेवकांच्या खादाड वृत्तीला कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने त्यांना चांगली अद्दल घडविली. एकाच दिवशी महसूलच्या दोन महिला तलाठी लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेल्या अन् त्यांची रवानगी पोलिस कोठडीत झाली. या प्रकारामुळे किनवट तहसीलसह शहरातील सर्वच शासकीय कार्यालयांत बुधवारी सामसुम पाहायला मिळाली. कारवाईची धास्ती अन् दबक्या आवाजात चर्चा होत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळाले.