आम्ही बैठकीत असताना पंतप्रधान प्रचार सभेत गुंतले होते : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:00 IST2019-02-20T20:58:07+5:302019-02-20T21:00:38+5:30
नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल असे मोदी म्हणाले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आम्ही बैठकीत असताना पंतप्रधान प्रचार सभेत गुंतले होते : शरद पवार
नांदेड : पुलवामा घटना ही देशावरचे संकट आहे, अशा संकटात आम्ही एकीची दर्शन घडवितो असा लौकिक आहे. परंतु, गृहमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आम्ही सर्वजण हजर असतांना पंतप्रधान प्रचार सभेत गुंतले होते अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेड येथे महाआघाडीच्या पहिल्या प्रचार सभेत केली.
शंकरराव मी गृहमंत्री होतो, देशाची ताकद काय आहे याची आम्हाला माहिती आहे. शास्त्री, इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवला, ही धमक त्यांच्यात होती. निवडणूक आल्या जातील परंतु देशात सध्या चिंतेची परिस्थिती आहे.दररोज जवान शहीद होत आहेत, दरवर्षी हल्ले वाढत आहेत, असे असताना सरकार केवळ '56 इंच' छातीच्या गोष्टी करते असेही पवार यावेळी म्हणाले. तसेच नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल असे मोदी म्हणाले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शेतकऱ्यांना नियमात अडकवले
आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना केवळ नियम अन निकषांच्या कचाट्यात अडकवले गेले. देश जगात गहू, कापूस, साखर निर्यात करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आम्ही आणला, बळीराजाने त्यासाठी घाम गळाला, बळीराजा उध्वस्त झाला तर देश उध्वस्त होईल असेही ते म्हणाले
राफेलचे भूत सरकारला गाडणार
लबाडच्या घरचं आवताण जेवल्याशिवाय खरं नाही. संरक्षण खात्याच्या काम आम्ही ही पाहिले आहे. एका विमानाची किंमत 500 कोटी हुन 1600 कोटींवर नेली, बाकीचे पैसे गेले कुठे, हे राफेलचे भूत सरकारला गडल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.