विष्णूृपुरीच्या पाण्यावर पथकांची गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:02 IST2019-04-26T01:00:17+5:302019-04-26T01:02:31+5:30
शहरातील विशेषत: दक्षिण नांदेडातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला असून, विष्णूपुरी प्रकल्पात असलेल्या ८.५७ दलघमी पाण्यातून जूनपर्यंत तहान कशी भागवायची, हा प्रश्न निर्माण झाला असून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील अवैध उपसा रोखण्यासाठी ३ पथके तैनात करण्याचे तसेच प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फीडरचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विष्णूृपुरीच्या पाण्यावर पथकांची गस्त
नांदेड : शहरातील विशेषत: दक्षिण नांदेडातीलपाणीप्रश्न ऐरणीवर आला असून, विष्णूपुरी प्रकल्पात असलेल्या ८.५७ दलघमी पाण्यातून जूनपर्यंत तहान कशी भागवायची, हा प्रश्न निर्माण झाला असून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील अवैध उपसा रोखण्यासाठी ३ पथके तैनात करण्याचे तसेच प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फीडरचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विष्णूपुरी प्रकल्पातून नांदेड शहराला पाणीपुरवठा केला जातो. प्रकल्पातून होत असलेला अवैध उपसा डिसेंबरपासूनच रोखण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र या सर्व उपाययोजना कागदावरच राहिल्या. राजकीय विरोधामुळे प्रशासन कारवाईला सरसावले नाही. त्यातच पुढे लोकसभा निवडणुका लागल्या. प्रशासनाचा झालेला कानाडोळा पाहता विष्णूपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अवैध पाण्याचा उपसा झाला. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच पाण्याचे गांभीर्य लक्षात आले. महापालिकेने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी २५ एप्रिल रोजी तातडीची बैठक घेत विष्णूपुरीचा प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला. प्रकल्पात आजघडीला केवळ १०.६१ टक्के म्हणजेच ८.५७ दलघमी पाणी उपलब्ध आहे. या पाण्यातून दक्षिण नांदेडला पाणी पुरवावे लागणार आहे.
जिल्हाधिकारी डोंगरे यांनी विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तत्काळ तीन पथके गठीत केली. एक पथक बोटीतून तर दोन पथके पायी गस्त घालणार आहेत. त्याचवेळी महावितरणला प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फीडरचा विद्युतपुरवठा खंडित करुन अवैध पंपाद्वारे होणारा उपसा थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात जवळपास ८ ते ९ किलोमीटर क्षेत्रात पाणी आहे. या प्रकल्पाच्या दोन्ही बाजुला जवळपास आठ ते दहा गावे आहेत. डाव्या बाजूला पाच आणि उजव्या सहा गावांमध्ये जवळपास २५० हून अधिक अनधिकृत वीजपंपाद्वारे पाणीउपसा केला जात आहे. हा पाणीउपसा थांबविण्याची गरज आहे. तो तत्काळ थांबवावा असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
विष्णूपुरीतील अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी स्थापन करण्यात येणाºया एका पथकात ७ कर्मचारी आहेत. त्यात पाटबंधारे विभागाचे २, महापालिकेचे २, तहसील, महावितरण आणि पोलीस विभागाचा प्रत्येकी १ कर्मचारी राहणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणीउपसा रोखला तरच दक्षिण नांदेडला पिण्यासाठी पाणी मिळणार आहे.
महावितरणचा हलगर्जीपणा भोवला
विष्णूृपुरी प्रकल्पातून होत असलेला अवैध उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी २ आॅक्टोबर २०१८ रोजी घेतलेल्या बैठकीत निर्देश दिले होते. आॅक्टोबरपासून विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी नियोजन केले जात आहे. १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर आणि १६ डिसेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत प्रकल्प परिसरातील सर्व बागायतदारांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र महावितरणने या आदेशाला केराची टोपलीच दाखविली. आतापर्यंत वीजपुरवठा बंद करण्यात आलाच नाही.
परिणामी प्रकल्पातून पाणीउपसा सुरुच राहिला. त्यामुळे आता नांदेडवर विशेषत: दक्षिण नांदेडवर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. १६ डिसेंबर रोजी महावितरणला स्पष्ट आदेश असतानाही वीजपुरवठा बंद करण्यात आला नाही. आता पुन्हा ़एकदा आदेश दिले आहेत. महावितरणने प्रकल्प क्षेत्रातील वीजपुरवठा बंद केला नाही तर मे अखेरच पाणी संपणार आहे. वीजपुरवठा बंद केला तर जून अखेरपर्यत पाणी उपलब्ध होईल, असे सूत्राने सांगितले.
उत्तर नांदेडचा पाणीप्रश्न सुटला
नांदेड शहराच्या पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी इसापूर प्रकल्पातून सांगवी बंधाºयात गुरुवारी पाणी उपलब्ध झाले. या पाण्याद्वारे उत्तर नांदेडची २० ते २५ दिवसांची तहान भागणार आहे. जवळपास २० मेपर्यंत हे पाणी पुरेसे ठरेल. त्यानंतर पुन्हा २० मे रोजी आणखी एक पाणीपाळी इसापूरमधून घेतली जाणार आहे. त्यामुळे जून मध्यापर्यंतचा उत्तर नांदेडचा पाणीप्रश्न मिटणार आहे. पर्यायी पाणीपुरवठा योजनेमुळे उत्तर नांदेडला दिलासा मिळाला आहे.