दत्तशिखराचा आधारवड कोसळला! महंत मधुसूदन भारती महाराज अनंतात विलीन, माहूरवर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:48 IST2026-04-06T12:47:56+5:302026-04-06T12:48:28+5:30
५ व्या वर्षी संस्थानात आगमन ते ३० वे महंत; मधुसूदन भारती महाराजांचा प्रेरणादायी प्रवास संपला.

दत्तशिखराचा आधारवड कोसळला! महंत मधुसूदन भारती महाराज अनंतात विलीन, माहूरवर शोककळा
माहूर (जि. नांदेड): नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र माहूर गडावरील दत्तशिखर संस्थानचे ३० वे महंत प.पू. मधुसूदन भारती महाराज यांचे ४ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वारकरी आणि दत्त संप्रदायावर शोककळा पसरली आहे. ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता दत्तशिखर परिसरात हजारो भक्तांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अध्यत्माचा प्रदीर्घ प्रवास
अहिल्यानगर येथे जन्मलेले मधुसूदन भारती महाराज वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी दत्तशिखर संस्थानात आले होते. १९७८ मध्ये प.पू. महंत गुरू अच्युत भारती महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची ३० व्या महंतपदी नियुक्ती झाली. तब्बल ४८ वर्षे त्यांनी या संस्थानची धुरा सांभाळत दत्तप्रभूंची सेवा आणि आध्यात्मिक परंपरा जोपासली. त्यांच्या निधनानिमित्त माहूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
नवे उत्तराधिकारी घोषित
संस्थानच्या परंपरेनुसार, महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी ईश्वर चिठ्ठीद्वारे नवीन महंतांची निवड करण्यात आली. यात प.पू. योगी शामभारती महाराज यांची दत्तशिखर संस्थानचे ३१ वे महंत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर मधुसूदन भारती महाराजांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
प्रशासकीय नियोजन
भक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेता माहूर आगाराकडून ४० जादा बसेसची सोय करण्यात आली होती. तहसीलदार अभिजित जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दत्तनगर येथे भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती.