वन्य प्राण्यांची शेतकऱ्यांना दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:30 IST2018-11-16T00:29:24+5:302018-11-16T00:30:28+5:30
या घटनेमुळे परिसरातील नागरीक व शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून वाघ आला रे वाघ आला़़़ या वातावरणात त्यांना आपले जीवन जगावे लागत आहे़

वन्य प्राण्यांची शेतकऱ्यांना दहशत
पार्डी : दुष्काळाचे चटके आता जंगलातील प्राण्यांनाही बसू लागले आहेत. जंगलातील पाणवठे आटल्यामुळे गावची वाट धरली आहे. चोरंबा (ना.), निमगाव (ता. हदगाव) व लहान (ता. अर्धापूर) शिवारात वाघाने प्रचंड दहशत पसरवली असून गेल्या काही दिवसात दिवसात शेतातील प्राण्यांना वाघाने फस्त केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरीक व शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून वाघ आला रे वाघ आला़़़ या वातावरणात त्यांना आपले जीवन जगावे लागत आहे़
निमगाव, चोरंबा, लहान परिसरातील जंगलात पाण्याचे पाणवटे आटल्यामूळे जंगलातील हिंस्र वन्यप्राण्यांचा पाण्याच्या शोधात गावाकडे वावर सुरू झाला आहे. हे तहानलेले व भुकेलेले हिंस्र प्राणी शेतक-यांचे पशूधन फस्त करीत आहेत. चोरंबा (ना.) व निमगाव परिसरात गेल्या दोन महिन्यापासून जंगलातील हिंस्त्र प्राण्यांचा वावर सुरू झाला आहे. मागील महिन्यात सोनाळा येथील लिंबाजी पांडूरंग ढाकरे यांच्या शेळ्यावर हल्ला करून एकाच रात्रीत १२ शेळ्या फस्त केल्या होत्या. त्यानंतर काही दिवसातच चोरंबा शिवारातील शेतकरी चक्रधर खानंसोळे यांच्या आखाड्यावर बांधलेली वगार (म्हैस) हल्ला करून ठार केली़ ही मृत म्हैस पाठीमागून ७५ टक्के त्या वाघाने खावून टाकली. त्यामुळे गावात वाघ आल्याची चर्चा सुरू झाली़
१५ नोव्हेंबर रोजी पहाटे लहान शिवारातील पुंजाराम गाजेवार यांच्या आखाड्यावरील जनावरांपैकी तीन वर्षाच्या वासराचा वाघाने फडसा पाडला आहे. या महिन्यातील तिसरी घटना असून लहान शिवारामध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या रबीचा हंगाम असून शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीलाच जात असतात. जंगल परिसरातही अनेक गावे आहेत. परिसरातील गावकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, महीला व लहान मुले वाघामुळे भयभीत झाले आहेत. शेतकरी शेतात जात नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. या परिसरात मनाठा, चोरंबा-निमगाव, चाभरा, सावरगाव या वन बिटामध्ये अंदाजे २ हजार ५०० हेक्टर जंगल क्षेत्र असून बिबटे, तडस, लांडगे, कोल्हे असे वन्यप्राणी आढळतात.