अशोक चव्हाण यांच्या मंत्रीपदाने काँग्रेसच्या नांदेडसह मराठवाड्याच्या गडाला बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 08:05 PM2019-12-31T20:05:40+5:302019-12-31T20:08:48+5:30

चव्हाण यांना कोणते खाते मिळते? याबाबत जिल्हावासियांना उत्सुकता लागली आहे.

Ashok Chavan's cabinet strengthened the Congress fort in Marathawada | अशोक चव्हाण यांच्या मंत्रीपदाने काँग्रेसच्या नांदेडसह मराठवाड्याच्या गडाला बळकटी

अशोक चव्हाण यांच्या मंत्रीपदाने काँग्रेसच्या नांदेडसह मराठवाड्याच्या गडाला बळकटी

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्राच्या राजकारणात चारवेळा मुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघातून सुमारे लाखाच्या मताधिक्क्याने विजय

नांदेड : अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी मुंबई येथे कॅबिनेट मंत्रिपदाची सातव्यावेळी शपथ घेतली. हे वृत्त समजताच नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत काँग्रेससह महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. अशोकराव चव्हाण यांच्या  मंत्रिपदामुळे नांदेडसह मराठवाड्यातील काँग्रेसचा गड आता आणखीनच भक्कम होणार आहे. दरम्यान, चव्हाण यांना कोणते खाते मिळते? याबाबत जिल्हावासियांना उत्सुकता लागली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात चारवेळा मुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांचाच राजकीय वारसा पुढे घेवून जात असलेल्या अशोकराव चव्हाण यांनीही महाराष्ट्र विधिमंडळात विविध खात्याचे मंत्रिपद भूषवित दोनवेळा मुख्यमंत्रीपदाच्या रुपाने राज्याचे नेतृत्वही केले आहे. १९८६ मध्ये युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून प्रथमच राज्यस्तराची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर १९८७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवित नांदेडचे प्रतिनिधित्व केले. १९९२ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. १९९३ ते ९५ या कालावधीत नगरविकास राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांच्याकडे महसूल खाते आले. तर २००३ ते २००४ या काळात  परिवहन आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. २००४ ते २००८ या काळात महत्त्वाच्या उद्योगमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. तर २००८ ते २०१० या काळात सलग दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले.  २०१४ मध्ये ते पुन्हा लोकसभेवर दुसऱ्यावेळी निवडून गेले तर २ मार्च २०१५ रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी सूत्रे सांभाळली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघातून सुमारे लाखाच्या मताधिक्क्याने विजय मिळविला. राज्यात महाआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर त्याचवेळी नांदेडला अशोकराव चव्हाण यांच्या रुपाने मंत्रीपद मिळणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार सोमवारी सातव्यावेळी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.  चव्हाण यांच्या शपथविधीचे वृत्त समजताच नांदेड शहरासह जिल्हाभरातून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी करीत चौकाचौकांत पेढे वाटून चव्हाण यांच्या मंत्रिपदाचे स्वागत करीत होते. 

दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबई येथील कुलाब्याच्या महिला विकास महामंडळामध्ये नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अशोकराव चव्हाण यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, माजी आ. अमिताताई चव्हाण, आ. रावसाहेब अंतापूरकर, आ. मोहनराव हंबर्डे यांच्यासह माजी आ. वसंतराव चव्हाण, हणमंतराव बेटमोगरेकर, भाऊराव साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपमहापौर सतीश देशमुख, माजी महापौर अब्दुल सत्तार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी मानले. दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शहरातील काँग्रेससह महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी             एकत्रित येवून चौकाचौकांत फटाकांची आतषबाजी केली़ तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला़ शहरातील कौठा, वजिराबाद, गोवर्धनघाट, आय़टी़आय़चौक, वर्कशॉप, श्रीनगर, तरोडा, सिडको, आदी भागात उशिरापर्यंत जल्लोष सुरु होता़  सोशल मीडियावरही शुभेच्छा संदेश मोठ्या प्रमाणात फिरत होते़

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मंत्रिपदामुळे मिळणार बळ
लोकसभा निवडणुकीचा अपवाद सोडला तर विरोधी पक्षात असतानाही बहुतांश निवडणुकांमध्ये काँग्रेसने जिल्ह्यात वर्चस्व राखलेले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अशोकराव चव्हाण यांच्यासह माधवराव पाटील जवळगावकर, रावसाहेब अंतापूरकर आणि मोहनराव हंबर्डे हे चौघे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. तळागाळातील कार्यकर्ता अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससोबत राहिल्यानेच पक्षाला हे यश मिळाले. चव्हाण यांच्या रुपाने जिल्ह्याला तब्बल नऊ वर्षानंतर मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस भक्कम होतानाच तळागाळातील कार्यकर्त्यांनाही मोठा आधार मिळणार आहे. अशोकराव चव्हाण यांना मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थामध्येही काँग्रेसचा दबदबा वाढणार आहे़ या बरोबरच महानगरपालिका, जिल्हा परिषदेसह जिल्ह््यातील नगरपालिका आणि इतर संस्थामधील रखडलेल्या कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे़ काँग्रेस यावेळी सत्तेत राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेसोबत आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनाही यावेळी काँग्रेससोबत राहणार असल्याने अशोकराव चव्हाण यांच्यासह काँग्रेसलाही बळ मिळणार आहे़ पर्यायाने स्थानिक स्वराज्य संस्थात महाआघाडी भक्कम होईल़

मराठवाड्याला न्याय मिळवून देवू- चव्हाण
महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्तास्थापन झाली. ही नांदेडसह मराठवाड्यासाठी सुवर्णसंधी आहे. मागील पाच वर्षांत भाजपा नेतृत्वाखालील सरकारने नांदेडसह मराठवाड्याच्या विकासाला खीळ बसविण्याचे काम केले. विकास कामाऐवजी केवळ थापा मारण्यात धन्यता मानल्याने राज्यात महाआघाडीचे सरकार आले. मराठवाड्यातील एक ज्येष्ठ प्रतिनिधी म्हणून मराठवाड्याचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. केवळ राजकीय द्वेषातून जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना भाजपा सरकारने स्थगिती दिली. तर काही प्रकल्पांचा निधी रोखला. ही कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून रस्ता सुधारणेलाही प्राधान्य देवू, असे सांगत मंत्रिपदाचा उपयोग मराठवाड्याला इतर भागाच्या बरोबरीला आणण्यासाठी करणार असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

Web Title: Ashok Chavan's cabinet strengthened the Congress fort in Marathawada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.