फोडणीच्या भातातून ९ जणांना विषबाधा; अर्धापूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:58 IST2025-05-30T18:57:46+5:302025-05-30T18:58:20+5:30
विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.

फोडणीच्या भातातून ९ जणांना विषबाधा; अर्धापूर तालुक्यातील घटना
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड) : फोडणीचा भात खाल्ल्याने ९ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील आमराबाद तांडा ता. अर्धापूर येथे घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुढे येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर तालुक्यातील आमराबाद तांडा येथे बुधवारी सकाळी काही जणांनी शिळा भात फोडणी देऊन खाल्ला. काही वेळातच काहींना उलटी, मळमळ तसेच पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यापैकी अनेकांनी बारड अर्धापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. औषधी घेऊन घरी परतले पण तब्येतीवर कुठलाही फरक न पडल्याने त्यांनी गुरुवारी रात्री आरोग्य विभागाच्या १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून नांदेड विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय गाठले.
विषबाधा झालेल्यांमध्ये राजू गुलाब पवार (वय ४०), संजय गुलाब पवार (वय ४२), स्वीटी राजू पवार (वय ११), धनश्री संजय पवार (वय ११), वंश राजू पवार (वय ५), वैष्णवी संजय पवार (वय १२), सुजाता संजय पवार (वय ३५), पूर्वी राजू पवार (वय १३), उषा राजू पवार (वय ३१) आदी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, घटना समजल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सा.जि.आरोग्य अधिकारी डॉ.संतोष सूर्यवंशी, अर्धापूर ता. आरोग्य अधिकारी डॉ.श्रीकांत देसाई, गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम, वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब पवार,वि.आ. डॉ.एस.पी.गोखले, ग्रामपंचायत अधिकारी डी.व्ही. देशमुख, सरपंच अश्विन पवार आदींनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांची प्रकृती जाणून घेतली.
पावसाळ्यात बाहेरचे अन्न खाण्यापूर्वी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच शिळे अन्न खाणे टाळावे. यावेळी गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली, सार्वजनिक स्त्रोताचे शुद्धीकरण करण्यात आले व नाले स्वच्छ करण्यात आली.
- डॉ.श्रीकांत देसाई, आरोग्य अधिकारी ता.अर्धापूर