योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत मांडण्यात आला. या प्रकरणातील आरोपी कोणत्याही पक्षाच्या जवळचे असले तरी कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकरणाच्या तपासात तंत्रज्ञान व आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव मांडला होता. दानवे यांनी या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष असल्याचा मुद्दा मांडला. यावर बोलताना फडणवीस यांनी सरकारीच भूमिका स्पष्ट केली. सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे तर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. फरार आरोपींना शोधण्यावर भर देण्यात येत आहे. सीआयडीकडे हे प्रकरण देण्यात आले असून त्यांच्या ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्यात येईल. ज्या पोलिसांनी या प्रकरणात कामचुकारपणा केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांवर नाहक अंगुलीनिर्देश होतोयावेळी फडणवीस यांनी राजकीय पक्ष व नेत्यांवर केलेल्या आरोपांवरदेखील भाष्य केले. हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात आपण जे बोलतो, ते १४ कोटी जनतेपर्यंत जात असते. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे, असे ज्यावेळी बोलले जाते, त्यावेळी विनाकारण त्या मंत्र्यांचा त्यात काही सहभाग नसतानादेखील त्यांच्याकडे कुठेतरी अंगुलीनिर्देश होतो, असे फडणवीस म्हणाले. आरोपी कोणत्या पक्षाचा आहे, जातीचा-धर्माचा आहे, कोणत्या नेत्याच्या जवळचा आहे, अशा प्रकारचा विचार न करता घटनेत सहभागी असणार्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.