आणीबाणीच्या काळात साहित्यिक, इतिहासकार मौन का होते ?
By योगेश पांडे | Updated: June 25, 2025 19:30 IST2025-06-25T19:29:25+5:302025-06-25T19:30:41+5:30
विनय सहस्त्रबुद्धे : कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले

Why were writers and historians silent during the Emergency?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही काळापासून राईचा पर्वत करत काही साहित्यिकांकडून सरकार व प्रशासनाविरोधात भूमिका घेण्यात येत असल्याचे दिसून येते. मात्र आणीबाणीच्या कालावधीत कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले होते. स्वातंत्र्यानंतर देशासमोरील त्या सर्वात कठीण काळात संबंधित साहित्यिक व इतिहासकारांनी मौन का साधले होते असा सवाल उपस्थित करत त्यांना नक्कीच इतिहास प्रश्न विचारणार असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. नागपुरात बुधवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
आणीबाणीनिमित्त नागपुरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त ते नागपुरात आले होते. पत्रपरिषदेदरम्यान त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी त्या काळात घाबरलेल्या होत्या, त्यामुळे आपल्या अवतीभवती विश्वासपात्र लोकांना नेमण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर इंदिरा गांधी यांनी देशात आपल्या कुटुंबातील सत्ता कायम ठेवण्यासाठी देशावर आणीबाणी लादली. आणीबाणीमुळे भारताच्या लोकशाही वर कलंक लागले. कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर संघटनांनी आणीबाणीचा विरोध केला असता लाखो लोकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. त्याबाबत कॉंग्रेसने उत्तर दिले पाहिजे, असे सहस्त्रबुद्धे म्हणाले.
खरगे निराधार बोलतात
मल्लिकार्जुन खरगे टीका करताना बहुतांश वेळा निराधार बोलतात. आणीबाणीच्या काळात आम्ही अशी टीका केली असती, तर ती छापलीदेखील गेली नसती. त्यामुळे खरगे यांच्या टीकेला जास्त उत्तर देण्याची गरज नाही. घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असे सहस्त्रबुद्धे म्हणाले. संविधानाच्या मुद्द्यांवर आमच्यावर विरोधकांकडून तथ्यहीन टीका करण्यात येते. मात्र याचा अर्थ आम्ही बचावात्मक पवित्रा घेतला आहे असा होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरेंनी केले होते देवरसांचे स्वागत
यावेळी सहस्त्रबुद्धे यांनी आणीबाणीला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील एक किस्सा सांगितला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी उचलली गेल्यानंतर मार्च १९७७ मध्ये तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. दादर रेल्वे स्टेशनवर त्यांचा स्वागत खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. एका बाळासाहेबांचा स्वागत दुसऱ्या बाळासाहेबांनी करू नये असं बंधन नाही असे त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.