कलम ३७० हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नव्हते
By आनंद डेकाटे | Updated: June 28, 2025 20:06 IST2025-06-28T16:51:05+5:302025-06-28T20:06:33+5:30
सरन्यायाधीश भूषण गवई : देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण तसेच डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

Whether in war or peace, the Constitution is capable of keeping the country united.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : या देशाला एकच घटना अभिप्रेत आहे. देशाला एकसंघ ठेवण्यासाठी एकच राज्यघटना असली पाहिजे, असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. फक्त एका राज्याकरिता वेगळी राज्यघटना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारला अभिप्रेत नव्हती. त्यामुळे संसदेने जेव्हा कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आले तेव्हा एकाच संविधानाने देश चालावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने संसदेने घेतलेला निर्णय एकमताने मान्य केला, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता विरेंद्र सराफ, माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. अनिल हिरेखण प्रामुख्याने उपस्थित होते.
सरन्यायाधीश गवई म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी असे संविधान तयार केले जे एकाचवेळी केंद्रीकृत आणि संघराज्यीय स्वरूपाचे आहे. युद्धाचा काळ असो वा शांततेचा, हे संविधान संपूर्ण देशाला एकसंघ ठेवण्यास समर्थ आहे. संविधानाच्या ७५ वर्षांच्या प्रवासानंतर प्रत्येक संकटाच्या वेळी भारत एकसंघ राहू शकला. ही या संविधानाचीच किमया असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर शहरातच आपल्या आयुष्याच्या अंतिम काळात ऐतिहासिक धम्मप्रवर्तन केले. या क्रांतिकारक घटनेचे स्मरण कायम राहण्यासाठी व यातून प्रेरणा घेण्यासाठी दीक्षाभूमी स्मारकाची स्थापना झाली. भौगोलिकदृष्ट्या भारताचा मध्यबिंदू असलेल्या झिरो माईल येथे संविधान चौक निर्माण झाला आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ परिसरात संविधान उद्देशिका पार्क उभा राहिला आहे. ही वास्तूही येथे भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचे स्मरण व प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले.
संजय सिरसाट यांनी आपल्या भाषणात संविधान उद्देशिका पार्कच्या उभारणीसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलेल्या अर्थसाहाय्यासहीत अन्य बाबींचा आढावा घेतला.
संविधान प्रास्ताविका पार्क समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी पार्कच्या निर्मितीमागचा इतिहास उलगडला. प्रभारी कुलगुरू डाॅ. माधवी खोडे यांनी स्वागतपर भाषण केले. माजी कुलसचिव डाॅ. पूरणचंद्र मेश्राम यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. संचालन कोमल ठाकरे यांनी केले. तर, विधि महाविद्यालयाचे संचालक डाॅ. रविशंकर मोर यांनी आभार मानले.