लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने धोकादायक इमारती म्हणून घोषित केलेल्या २४१ जीर्ण इमारतींपैकी बहुतांश इमारती मालक व भाडेकरूंच्या वादात अडकल्या आहेत. मनपा प्रशासन दरवर्षी नोटीस बजावते पण घरमालक व भाडेकरूंचे वाद न्यायालयापर्यंत पोहचल्याने भाडेकरूं इमारतीबाहेर पडायला तयार नाहीत. त्यामध्ये बहुतांश इमारती गांधीबाग व मंगळवारी झोनमधील आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनही हतबल आहे. या इमारतीतील भाडेकरू जीव गेला तरी चालेल, पण इमारतीतून बाहेर पडायला तयार नाही.
नगरविकास विभागाच्या परिपत्रकानुसार, जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कार्यवाहीबाबत महापालिकेने इमारतींचे झोननिहाय सर्वेक्षण केले. त्यात २४१ इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये सर्वाधिक ७३ जीर्ण इमारती गांधीबाग झोनमध्ये आहेत. तर ६८ इमारती या मंगळवारी झोनच्या हद्दीत आहेत. विशेष म्हणजे, शहरातील २२४ जीर्ण इमारतींना ऐन पावसाळ्यात महापालिकेने नोटीस बजावली आहे. २४१ जीर्ण इमारतींपैकी ६१ इमारतींची दुरुस्ती करण्यात आली. त्यातील ५१ इमारती दुरुस्त करण्यासारख्या नसल्याने पाडण्यात आल्या आहेत. आजही अनेक नागरिक धोकादायक डमारतींमध्ये राहत आहे.
धोका होऊ शकतोपावसाळ्यात धोकादायक इमारती किंवा घरांचा वापर करणे धोक्याचे आहे. अशा इमारती किंवा घरांचा वापर केल्यास जीवित वा वित्तहानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी धोकादायक इमारती किंवा घरांमध्ये रहिवास किंवा वापर करणे तत्काळ थांबवावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.