७१.६८ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन कापण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST2021-02-05T04:59:47+5:302021-02-05T04:59:47+5:30
कमल शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्राहकांकडे असलेली ६० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे आर्थिक स्थिती खराब झाल्याचे कारण ...

७१.६८ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन कापण्याचा इशारा
कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्राहकांकडे असलेली ६० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे आर्थिक स्थिती खराब झाल्याचे कारण पुढे करून महावितरणने थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार विदर्भात ७१ लाख ६८ हजार ५९६ वीज ग्राहकांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसची मुदत ३० जानेवारीला संपणार आहे. सोमवारपासून मोठ्या संख्येने वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महावितरणने कडक वसुली करण्याची घोषणा करून २० केडब्ल्यू दाबापेक्षा अधिक ग्राहकांना प्रत्यक्ष आणि अन्य थकबाकीदारांना एसएमएसच्या माध्यमातून १५ डिसेंबरपासून नोटीस पाठविणे सुरू केले आहे. यात थकबाकी भरण्याचे आवाहन करून १५ दिवसांच्या मुदतीत थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक नोटीस पुणे प्रदेशातील ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. तेथे २४ लाख १४ हजार ८६८ ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून नोटीस पाठविण्यात आली आहे. सर्वात कमी नोटीस औरंगाबाद प्रदेशात जारी करण्यात आल्या आहेत. तेथे ९ लाख ९७ हजार ३९७ जणांना नोटीस पाठविण्यात आली आहे. विदर्भ (नागपूर प्रदेश) १६ लाख ७९ हजार ९८४ ग्राहकांना नोटीस पाठविण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे लॉकडाऊनच्या काळात मीटर रीडिंग बंद झाले. सप्टेंबरमध्ये पुन्हा ही प्रक्रिया सुरू झाली. ग्राहकांना एकमुश्त बिल देण्यात आले. दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोनामुळे अर्थव्यवस्था प्रभावित झाल्यामुळे लॉकडाऊनमध्ये बिलात सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी डिसेंबरपर्यंत कनेक्शन न तोडण्याचे निर्देश दिले होते; परंतु शासनाला सवलत देणे शक्य झाले नाही. राज्य शासनाने नकार दिल्यानंतर आता महावितरणने सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, तर सूत्रांच्या मते मुदतीनंतर कनेक्शन कापण्याची मोहीम आक्रमक चालविण्यात येणार नाही. नागरिकांनी बिल भरावे, असा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. दुसरीकडे भाजपासह इतर राजकीय पक्षांच्यावतीने या मोहिमेचा विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नाइलाजास्तव कनेक्शन कापावे लागणार
महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कंपनीची आर्थिक स्थिती पाहून वीज कनेक्शन कापण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सांगितले. त्यांनी ग्राहकांना बिल भरण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भात सर्वाधिक नोटीस नागपुरात
जिल्हा नोटीस
नागपूर शहर २०,५९९२
नागपूर ग्रामीण ११,५४४१
वर्धा १३,६०७९
अकोला १५,४७९२
बुलडाणा २१,७०७३
वाशिम ७५,७५१
अमरावती २५,१४७६
यवतमाळ १७,७३९०
चंद्रपूर ११,५०६७
गडचिरोली ७९,०६८
भंडारा ६६,६२३
गोंदिया ८५,२३२
एकूण १६,७९,९८४
कुठे किती जणांवर पडणार परिणाम
विभाग नोटीस मिळालेले ग्राहक
नागपूर : १६७९९८४
औरंगाबाद ९९७३९७
कोकण २०७६३४७
पुणे २४१४८६८
एकूण ७१६८५९६
...........