लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमित रेल्वेगाड्या बंद आहेत. परंतु रेल्वे बोर्डाच्या वतीने विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. यात रेल्वे प्रशासनाने नागपूर-जबलपूर-नागपूर ही सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरु केली. परंतु कोरोनामुळे प्रवासी प्रवास टाळत असल्याने या गाडीला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असून रेल्वेचे नुकसान होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. उत्पन्न वाढविण्यासाठी रेल्वेने विशेष पार्सल रेल्वेगाड्या, कामगार स्पेशल गाड्या सुरु केल्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. यात २६ ऑक्टोबरपासून रेल्वेगाडी क्रमांक ०२१६० जबलपूर-नागपूर आणि २७ ऑक्टोबरपासून ०२१५९ नागपूर-जबलपूर ही रेल्वेगाडी सुरु करण्यात आली. परंतु कोरोनामुळे प्रवासी प्रवास करण्याचे टाळत असल्यामुळे या दोन्ही गाड्यांना प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. ३१ ऑक्टोबरला नागपूर-जबलपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सेकंड सिटींगमध्ये ३३७ बर्थ रिकामे आहेत. तर स्लिपरमध्ये २४८, थर्ड एसीत १४५, सेकंड एसीत ३९, फर्स्ट एसीत १८ बर्थ रिकामे आहेत. १ नोव्हेंबरला सेकंड सिटींगमध्ये ३२४, स्लिपरमध्ये २५४, थर्ड एसीत १३९, सेकंड एसीत ४३, फर्स्ट एसीत १६ बर्थ रिकामे आहेत. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे रेल्वेचे नुकसान होत आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांचा या गाडीला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.