संक्रमणकाळाचा उपयोग लढण्यासाठी करा!
By Admin | Updated: May 12, 2014 01:01 IST2014-05-12T01:01:18+5:302014-05-12T01:01:18+5:30
भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये संक्रमणाचा काळ धुडगूस घालतो आहे. त्याचा उपयोग भांडवलवादी टाळकी परिवर्तनाच्या चळवळी उद्ध्वस्त करण्यासाठी करीत आहेत.

संक्रमणकाळाचा उपयोग लढण्यासाठी करा!
नागपूर : भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये संक्रमणाचा काळ धुडगूस घालतो आहे. त्याचा उपयोग भांडवलवादी टाळकी परिवर्तनाच्या चळवळी उद्ध्वस्त करण्यासाठी करीत आहेत. अशावेळी परिवर्तनवाद्यांनीसुद्धा या संक्रमणकाळाचा उपयोग लढण्यासाठी करावा. नवभांडवली जागतिकीकरणाचं,नव-साम्राज्यवाद्यांच्या उदारीकरणाचं आणि खासगीकरणाचं आक्रमण उद्ध्वस्त करण्यासाठी याचा उपयोग करा, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या विद्यमाने आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि निळाई सामाजिक व सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णचंद्र बुटी हॉल रामदासपेठ येथे आयोजित आंबेडकरी काव्यसंगितीला सुरुवात झाली. उद्घाटनीय कार्यक्रमात डॉ. मनोहर यांनी बीजभाषण केले. साहित्यिक अशोक बुरबुरे अध्यक्षस्थानी होते तर डॉ. प्रदीप आगलावे, राहुल दहीकर, प्रा. सतेश्वर मोरे प्रमुख अतिथी होते. डॉ. मनोहर म्हणाले, माहिती तंत्रज्ञान आणि माध्यमक्रांतीने इहवाद, बुद्धिवाद, व्यक्ती स्वातंत्र्यवाद, समता, स्वातंत्र्य आणि बंधूता या आधुनिक मूल्यांचा महाप्रकल्प अमान्य केलेला आहे. नवभांडवलशाहीच्या उदारीकरणाने आणि खासगीकरणाने जगाचं रूपांतर हृदयशून्य बाजारपेठेत केलेले आहे. मानवी मूल्यांना पदच्युत करून त्यांच्याजागी अर्थमूल्यांची प्रस्थापना केली जात आहे. या नवभांडवली उदारीकरणामुळे परिवर्तनवादी माणूस उदास व्हायला लागला आहे. परंतु हा संक्रमणाचा काळ आहे. तो पाहुण्यासारखा असतो. त्यामुळे परिवर्तनाच्या चळवळीतील सैनिकांचे हे निराश होणे प्रस्थापितांच्या दारात झोळी घेऊन जात राहणे आणि हौसला गमावून बसणे ही बाब सर्वच अभावग्रस्तांना उद्ध्वस्त करणार्या फॅसिझमला दार उघडून देण्यासारखे आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आजही मूल्यसंघर्ष पार विझून गेला असं नाही. भांडवलशाहीने स्वत:चा एकतर्फी विजय जाहीर करण्याचा खेळ केला असला तरी हा विजय खरा नव्हे. जगात आणि देशातील वेगवेगळ्या भागात हा संघर्ष थांबला नाही. परिवर्तनवाद्यांचा लोकशाही समाजवादावर विश्वास आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. अशोक बुरबुरे, डॉ. प्रदीप आगलावे, प्रा. सतेश्वर मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. त्रिलोक हजारे स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक रत्नाकर मेश्राम यांनी केले. मुख्य संयोजक प्रवीण कांबळे संचालन केले. शामराव हाडके यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)