जातीने नव्हे, गुणांनी मोठा असलेला समाज निर्माण व्हावा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
By आनंद डेकाटे | Updated: June 29, 2025 19:09 IST2025-06-29T19:09:26+5:302025-06-29T19:09:37+5:30
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कारांचे वितरण

जातीने नव्हे, गुणांनी मोठा असलेला समाज निर्माण व्हावा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर: कोणतीही व्यक्ती जात-पात, धर्माने मोठी नसते, तर तिच्या गुणांनी मोठी होत असते. आपल्याला समाजातील आर्थिक, सामाजिक विषमता दूर करून जातीने नव्हे तर गुणांनी मोठा असलेला समाज निर्माण करायचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केले.
कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर येथे विवेक विचार मंच, बार्टी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी परिषदेचे उद्घाटन महसूल मंत्री तथा पालकमंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक न्याय परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेवराव कांबळे अध्यक्षस्थानी होते. बार्टीचे महासंचालक सुनील वारे, भंते महानाग, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, सुनील किटकरू, स्वागत समितीचे भय्यासाहेब बिघाने, संदीप जाधव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, या परिषदांतून निघणारी तथ्ये, माहिती ही विकसित भारत घडविण्यात मोलाची भूमिका बजावणारी आहेत. शासनाच्या विविध योजना व उपक्रम राबविताना याची निश्चितच दखल घेतली जाईल. कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. प्रास्ताविक महेश पोहनेरकर यांनी केले. संचालन निलेश धायरकर यांनी केले तर आभार सागर शिंदे यांनी मानले.
वंचितांची सेवा करणाऱ्या व्यक्तींची योग्य दखल घेऊ - संजय सिरसाट
समाजातील वंचित घटकांची विविध माध्यमातून ज्यांनी सेवा केली आहे त्याची दखल घेण्याची गरज आहे. अनेक जण विविध अडचणीवर मात करून समाज कार्य करतात. त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे गरजेचे आहे. त्यांना आणखी पुढे जाण्याचा उत्साह कायम राहिला पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी येथे केले.
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कारांचे वितरण
विवेक विचार मंचातर्फे दिला जाणारा छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२५ यावेळी प्रदान करण्यात आले. यामध्ये डॉ. रेखा बहनवाल, ॲड. संदीप जाधव, राजेंद्र गायकवाड, चंद्रकांत काळोखे, आनंद लोखंडे, विकास अवसरमल, नागेश पाटील, प्रताप निंदाणे, रेखा कांबळे, खुशाल ढाक यांना यांचा समावेश होता.